नयनतारा सेहगल आणि मराठी साहित्य संमेलन वाद प्रकरणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी
Raj Thackeray And Nayantara Sahgal (Archived, edited, representative images)

92 Akhil bhartiya Marathi sahitya sammelan:  92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन नयनतारा सेहगल (Nayantara Sahgal) यांच्या हस्ते करण्यावरून मनसे कार्यकर्ते राजू उंबरकर यांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता मात्र आता या वादामध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  पक्षाची अधिकृत भूमिका मांडून नयनतारा सेहगल यांचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे म्हटलं आहे. या वादामुळे आयोजकांना, नयनतारा यांना झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय आहे राज ठाकरेंची भूमिका -

राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून मराठी साहित्य संमेलन आणि नयनतारा यांच्या हस्ते होणारे उद्धाटन यावर आपली बाजू मांडण्यासाठी ट्विटरवर एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये दरवर्षी 'साहित्य संमेलन' आयोजित करण्याचा इतिहास फक्त महाराष्ट्रातच असल्याचं म्हटलं आहे. एका मनसे कार्यकर्त्याने विरोध केला असला तरीही माझा विरोध नाही असे म्हटले आहे. नयनतारा यांनी जरूर यावं आम्ही त्यांचं स्वागत करतो. तसेच मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असेही त्यांनी म्हटलं आहे.

नयनतारा यांनी भारतामध्ये 'पुरस्कार वापसी' या मोहिमेची सुरूवात केली.देशामधील असहिष्णू वातावरणावर टीका करत साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. त्यांच्यासोबतच 10 दिग्गज साहित्यिकांनीही आपले पुरस्कार परत केले होते. नयनतारा सेहगल या भारताचे पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या भाची आहेत. 1986 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने 'रिच लाईक अस' (Rich Like Us)या पुस्तकासाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.