मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 2 जणांनी मुंबई महापालिकेला लुटल्याचा नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई मनपा कार्यालयातून नुकतेच 'अतितात्काळ' परिपत्रक पाठवण्यात आले आहे. त्या पत्रकात नमूद केल्यानुसार 2019 - 20 च्या बजेटमध्ये महसुली उत्पन्नात घट अथवा महसुली खर्चात वाढ झाल्यास मनपाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. हे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माध्यमांसमोर सादर केले.
'मुंबई महापालिकेचे बजेट ३० हजार कोटींचे आहे. मात्र, तरीही मुंबई शहराची परिस्थिती वाईट आहे. मुंबईत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे तीस हजार कोटी गेले कुठे याचा लेखाजोखा या मंडळींनी द्यावा,' असा टोला नवाब मलिक यांनी शिवसेना व भाजप पक्षाला लगावला आहे.
निरज गुंडे कोण आहेत व ते मुख्यमत्र्यांच्या घरी व मातोश्रीवर का जातात असा सवाल देखील त्यांनी केला.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड व निरज गुंडे यांनी महानगरपालिकेला लुटले आहे व शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेचे खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.