
Bengaluru Stampede Case: बेंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी (Bengaluru Stampede Case) आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) धाव घेतली. एम चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. बेंगळूरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी प्रकरणी 11 जणांचा मृत्यू झाला होता. तथापि, आयपीएल फायनलमध्ये आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करणारी कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडनेही त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणारी वेगळी याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, आरसीबीचे मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड (आरसीएसएल) यांनी असा युक्तिवाद केला आहे की त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. याचिकेनुसार, आरसीएसएलने सोशल मीडियावर स्पष्टपणे सांगितले होते की, फक्त मर्यादित पास उपलब्ध आहेत. तसेच कंपनीने मोफत पाससह प्रवेशासाठी देखील पूर्व-नोंदणी अनिवार्य असल्याचे म्हटले होते. दुपारी 1:45 वाजता उघडणारे स्टेडियमचे दरवाजे प्रत्यक्षात दुपारी 3 वाजता उघडण्यात आले, ज्यामुळे मोठी गर्दी झाली. तथापि, कंपनीच्या मते, गर्दी व्यवस्थापनात पोलिसांच्या अपयशामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. सोमवारी दुपारी उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा - Bengaluru Stampede Tragedy: मोठी बातमी! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्षांचा राजीनामा)
क्रिकेट स्टेडियम हलवण्याचा विचार -
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण मृत्युमुखी पडल्याबद्दल दुःख व्यक्त केले. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्टेडियम दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. सरकार क्रिकेट स्टेडियम दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा विचार करेल. कोणत्याही सरकारमध्ये अशी अप्रिय घटना घडू नये. वैयक्तिकरित्या, या घटनेने मला आणि सरकारला खूप दुःख झालं आहे, असं सिद्धरामय्या यांनी नमूद केलं.