Weather Forecast India: भारतात कोणत्या राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस? हवामान विभागाने वर्तवला 31 ऑगस्ट पर्यंत हवामानाचा अंदाज
Heavy Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Heavy Rain Forcast: भारताच्या ईशान्य, पूर्व आणि दक्षिण भागात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain In India) कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान असम आणि मेघालयच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते. त्यासोबतच अंदमान निकोबार बेटांसह अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांमध्ये 28 ते 31 या काळात मुसळधार पावसाच्या रुपात वरुनराजा बरसताना पाहायला मिळू शकतो.

दरम्यान, आयएमडीने आपल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, पुढील 5 दिवसांत ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये हलका किंवा मध्यम प्रमाणात पाऊस तसेच, गडगडाटी वादळ किंवा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. असम आणि मेघालयात 28, 28 ऑगस्टच्या दरम्यान अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटांवर 28 ऑगस्ट, 29, 2023 रोजी पाऊस पडू शकतो. तर केरळ आणि लगतच्या तामिळनाडूमध्ये पुढील तीन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

पुढच्या आठवड्यात भारतात पावसाचा जोर काहीसा कमी पाहायला मिळू शकतो. हिमालयाच्या पायथ्याजवळून मान्सूनचा प्रवास काहीसा सुरुच आहे. जो पुढच्या चारपाच दिवसांमध्ये त्याच्या सामान्य स्थितीनुसार उत्तरेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्वेकडून गोरखपूर वरुन पूर्वेच्या दिशेने पुढे मणिपूरपर्यंत जातो.

यंदाच्या वर्षी मान्सून काहीसा उशीरा दाखल झाला. इतकेच नव्हे तर उशीरा दाखल झालेला मान्सून मनासारखा बरसलाही नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही नद्या, नाले, ओढे यांना म्हणावे तसे पाणी वाहिले नाही. परिणामी धरती तहाणलेलीच राहिली. ज्याचा परिणाम विद्यमान आणि संभाव्य पाणीटंचाई होण्यात दिसू लागला आहे.  आता तर ऑगस्ट महिना संपत आला म्हणजे पावसाळा संपण्यास आता काहीच अवधी बाकी आहे. असे असतानाही पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील, देशातील शेतकरी चिंतेत आहेच. पण त्यासोबत आता शहरी भागातही पाण्याची मोठीच कमतरता भासू शकते. त्यामुळे सावध ऐका पुढच्या हाका असा इशारा पर्यावरणाचे अभ्यासक देऊ लागले आहेत.