Lok Sabha Election 2024: राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' UP मध्ये दाखल, अखिलेश यादव यांच्याकडून काँग्रेसला अंतिम ऑफर
Rahul Gandhi And Akhilesh Yadav | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार विरोधात विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेल्या इंडिया (INDIA alliance in Uttar Pradesh) आघाडीच्या प्रवासात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. इनडीएमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) बाबतच्या जागावाटपारुन तिढा असल्याची चर्चा आहे. या चर्चेला बळकटी देणारी घडामोड उत्तर प्रदेश राज्यातून पुढे येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) काँग्रेस (Congress) पक्षासाठी केवळ 17 जागांची ऑफर दिली आहे. यावर काँग्रेस पक्षाकडून अद्याप तरी अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताना सपाकडून आलेली ही ऑफर महत्त्वाची ठरते.

काँग्रेसकडून प्रस्तावाबद्दल सावध भूमिका

समाजवादी पक्षाकडून 17 जागांची ऑफर ही अंतिम असल्याचा दावा केला जात असला तरी काँग्रेस सूत्रांनी मात्र या प्रस्तावास सहमती दर्शवली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपाने जागावाटपाची बोलणी निश्चित होईपर्यंत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे टाळले आहे. समाजवादी पक्षाने सुरुवातीला काँग्रेसला 11 जागा देऊ केल्या. त्यानंतर त्यात सहारनपूर आणि अमरोहा जागांच्या समावेशानंतर 15 पर्यंत वाढल्या. मात्र, काँग्रेसने मुरादाबाद किंवा बिजनौरची जागा मागितल्याने वाटाघाटी मध्येच थांबल्या आणि त्यात विस्कळीतपणा आला. सपा आपल्या 17 जागांच्या अंतिम ऑफरवर ठाम राहिल्याने कासीसा विसंवाद निर्माण झाला आहे. ज्यामुळे पुढची बोलणी लटकली आहेत. (हेही वाचा, Akhilesh Yadav: अखिलेश यादवने काँग्रेसला दिली 17 जागांची शेवटची ऑफर)

राहुल गांधी यांना मध्यस्थीची विनंती

अखिलेश यादव यांनी युतीची औपचारिकता पूर्ण झाल्यावर न्याय यात्रेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. परंतू, त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून ऑफरसंदर्भात तत्काळ प्रतिसाद देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाटाघाटींमध्ये सहभागी असणाऱ्या नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत बोलणी अयशस्वी झाल्यास युतीचे विघटन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सपाच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर आघाडी होण्यात मोडता घातल्याचा आरोप केला. ही बोलणी संपुष्टात आल्यास त्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावरच असेल, असा इशारा सपा नेते फखरुल हसन चंद यांनी केला आहे. त्यांनी या प्रश्नात राहुल गांधींना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi Visits Wayanad: राहुल गांधी तातडीने वायनाडमध्ये दाखल, 'भारत जोडो न्याय यात्रा' अल्प काळासाठी स्थगित, कारण घ्या जाणून)

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, उत्तर प्रदेश राज्यात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन निर्माण झालेला तिढा हा पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेससमोरील अशाच आव्हानांचे प्रतिबिंब आहे. पश्चिम बंगालमध्ये, तृणमूल काँग्रेसचे जागावाटपावरून काँग्रेससोबत बिनसले. त्यानंतर पंजाबमध्येही आम आदमी पक्षानेही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेस पक्षासमोर विशेष पर्यायच शिल्लख राहिला नाही. उत्तर प्रदेश राज्यातही असेच काहीसे घडण्याची चिन्हे आहेत.