PM Narendra Modi Speech in Parliament: 'मला वाटते कॉंग्रेसने पुढील 100 वर्षे सत्तेत न येण्याचे ठरवले आहे'- पीएम नरेंद्र मोदींनी साधला निशाणा
Prime Minister Narendra Modi | File Image | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये सर्वप्रथम लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पित केली त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर गरीबाच्या घरात पडणारा प्रकाश देशाच्या सुखाला बळ देतो. जेव्हा गरिबांच्या घरात गॅस कनेक्शन असते, धुराच्या चुलीपासून मुक्तता मिळते, याचा आनंद काही औरच असतो. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले की, सदनासारख्या पवित्र स्थळाचा वापर देशाच्या विकासासाठी व्हायला हवा, मात्र त्याचा राजकारणासाठी वापर होणे दुर्दैवी आहे.

ते म्हणाले, साथीच्या रोगात मोठ्या प्रमाणावर राजकारण घडले. कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या. पहिल्या लाटेत देश लॉकडाऊनमध्ये होता. जिथे आहात तिथेच रहा असे आरोग्य तज्ज्ञ सांगत होते, परंतु काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर उभे राहून लोकांना इतरत्र जाण्यास उद्युक्त केले. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारमुळे कोरोनाने यूपीला आपल्या कवेत घेतले. काँग्रेसच्या या वागण्याने केवळ मीच नाही तर संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला आहे.

ते पुढे म्हणाले, देश सध्या 100 वर्षांतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एवढे मोठे संकट आले पण देशातील जनतेला काही गोष्टी पटवून देण्याचे काम पक्षाच्या एकाही मोठ्या नेत्याने केले नाही. एवढ्या मोठ्या संकटातही ते थोडेसे पवित्र कार्य करण्यास चुकले. कधी-कधी मला वाटते, की काँग्रेस पक्ष पुढची शंभर वर्षे सत्तेत येणार नाही, असे त्यांनी मनाशी ठरवलेले आहे. त्यांचे विचार आणि कृती पाहून मला हे जाणवते.

विरोधी पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही लोकांची आयुष्ये बदलत आहोत आणि तुम्ही फाईलमध्ये हरवला आहात. आम्ही गेल्या सात वर्षांत अनेक क्षेत्रात बदल केले आहेत. प्रत्येक क्षेत्रात उत्पादन वाढत आहे. अर्थव्यवस्था चांगली असेल तरच रोजगार निर्माण होतील. आज सर्वत्र रस्ते, महामार्ग, विमानतळ आहेत. मुद्रा योजना खूप यशस्वी झाली आहे. लाखो लोक हमीशिवाय कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करत आहेत. याचा फायदा करोडो कामगारांना होत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या सात वर्षांत 60 हजार स्टार्टअप सुरू झाले. तर 2014 पूर्वी देशात फक्त 500 स्टार्ट-अप होते. आम्ही नव्याने विचार करायला सुरुवात केली. सरकारच्या धोरणांमुळे तरुणांची ताकद वाढली आहे. काँग्रेसने मेक इन इंडियाची खिल्ली उडवली, कारण इन इंडिया म्हणजे कमिशनचे मार्ग बंद, मेक इन इंडिया म्हणजे भ्रष्टाचाराचे मार्ग बंद, मेक इन इंडिया म्हणजे तिजोरी भरण्याचे मार्ग बंद झाले म्हणून हे घडत आहे. (हेही वाचा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी विजयी व्हवाी- ममता बॅनर्जी)

पंतप्रधान म्हणाले की, देशातील जनतेने तुम्हाला ओळखले आहे, काही लोकांना आधी ओळखले आहे, काही लोक आता ओळखत आहेत आणि काही लोक येत्या काळात ओळखतील. ते म्हणाले, नागालँडच्या जनतेने 1998 मध्ये काँग्रेसला शेवटचे मतदान केले होते. ओडिशाने 1995 मध्ये शेवटचे मतदान केले होते. गोव्यात 1994 मध्ये तुम्ही पूर्ण बहुमत मिळवले. त्रिपुरामध्ये 1988 मध्ये तुम्हाला शेवटची मते मिळाली होती. 1985 मध्ये यूपी, बिहार, गुजरातमध्ये तुम्हाला मतदान केले. बंगालमध्ये 1972 मध्ये म्हणजे 50 वर्षांपूर्वी तुम्हाला निवडले गेले होते. तामिळनाडूच्या जनतेने तुम्हाला संधी देऊन पाहिले, त्याआधी तुम्हाला सुमारे 60 वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये संधी मिळाली होती. तेलंगण निर्माण करण्याचे श्रेय घेता, पण तेलंगणातील जनतेने तुम्हाला स्वीकारले नाही. झारखंडची निर्मिती होऊन 20 वर्षे झाली, पण ते तुम्हाला स्वीकारत नाहीत.