निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय ची पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे दया याचिका; 'हे' आहे कारण
Nirbhaya case convict Akshay Singh | (Photo Credits: Twitter)

निर्भया बलात्कार (Nirbhaya Rape Case) प्रकरणातील दोषी अक्षय (Akshay)  याने आज, 29 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्याकडे दया याचिका (Mercy Petition)  दाखल केली आहे, यापूर्वी अक्षयचे याचिका एकदा राष्ट्रपतींकडून फेटाळून लावण्यात आली होती मात्र तरीही पुन्हा एकदा याचिका करण्याचे कारण देखील अक्षयने स्पष्ट केले.आधीच्या याचिकेत काही महत्वाचे मुद्दे नमूद करायचे राहून गेले होते, ज्यामुळे राष्ट्रपतींनी याचिका फेटाळली असेल असे सांगताना यावेळेस हे मुद्दे लक्षात घेऊन फाशीची शिक्षा माफ केली जाईल याबाबत अक्षय ने सकारात्मकता दर्शवली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना आता 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल असा निर्णय पटियाला कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोषींकडून या ना त्या मार्गाने सुटण्यासाठी पळवाट शोधली जात आहे.

ANI ट्विट

प्राप्त माहितीनुसार, काल दोषी पवन याच्याकडून सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव पिटिशन दाखल करण्यात आले होते.या पिटिशनमध्ये पवन गुप्ता याने आपली फाशीची शिक्षा मरेपर्तंयत जन्मठेपेत बदलावी अशी विनंती केली होती, तर त्याआधी दोषी विनय याने वैद्यकीय उपचारांसाठी मागणी करत याचिका केली होती, विनयची याचिका पटियाला कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली होती.

दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील घडामोडी पाहिल्यास दरवेळेस याचिकांच्या मार्फत दोषींनी ऐनवेळी शिक्षा लांबवण्याचा प्रयत्न केला आहे, यावेळेस सुद्धा अवघ्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा दया याचिका दाखल करून हाच प्रयत्न सुरु आहे, मात्र यावर राष्ट्रपतींची काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.