मुंबई: महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढत असतानाच आता राज्यावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. ३० मार्चपासून राज्यात ढगाळी वातावरण निर्माण होणार असून दुपारनंतर वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पहा उद्याचे हवामान.
३० मार्च: खानदेश आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट
३० मार्च रोजी राज्याच्या विविध भागांत हवामानात मोठा बदल होणार आहे. प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी वेगाने वारे वाहून गारपीट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित विदर्भातही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
३१ मार्चला पावसाचा जोर ओसरणार
३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही राज्यातील हवामान पूर्णपणे स्थिर नसेल. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर अस्थिर हवामानामुळे हलका पाऊस किंवा वादळी वारे वाहू शकतात. नागरिकांनी या काळातही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 28, 2026
१ ते ४ एप्रिल: पावसाच्या प्रमाणात वाढ
३१ मार्चच्या विश्रांतीनंतर १ एप्रिलपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. ४ एप्रिलपर्यंत राज्याच्या अनेक भागांत वादळी पावसाचे सावट राहील. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे निर्माण होणारी ही स्थिती शेतीकामांवर परिणाम करू शकते. त्यामुळे या चार दिवसांच्या कालावधीसाठी हवामान विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
सध्या रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. वादळी वारे आणि संभाव्य गारपिटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.