Amit Shah On CAA: सीएए कुठल्याही परिस्थिती मध्ये मागे घेतला जाणार नाही - अमित शाह यांनी केलं स्पष्ट
सीएए कायद्यामुळे कुणाचंही नागरिकत्व जाणार नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही असं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह म्हणाले आहे.
केंद्र सरकारने भारतामध्ये सीएए (CAA) कायदा लागू केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सीएए कायद्याला मुस्लिम विरोधी कायदा म्हटलं जात असतात त्यात काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट करत कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी सरकार हा कायदा मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सीएए कायद्यामुळे कुणाचंही नागरिकत्व जाणार नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही असं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह म्हणाले आहे.
संसदेने मंजुरी दिल्यानंतर आता पाच वर्षांनी भारतामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. यावेळी अमित शाहा यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. उद्धव ठाकरेंना आव्हान देत त्यांनी तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे. असे अमित शाह म्हणाले आहेत.
लवकरच पश्चिम बंगालमध्येही लवकरच भाजपाचं सरकार येईल. ममता बॅनर्जी घुसखोरीचं समर्थन करणार असतील तर तिथे त्यांचं सरकार राहणार नाही असंही अमित शाह यांनी ANI सोबतच्या मुलाखती मध्ये म्हटलं आहे.
विरोधकांना मोदी सरकारला विरोध करण्यावाचून दुसरे काम नाही. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्येही राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादाविरोधात कारवाई करायला नको होती का? असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे. विरोधकांनी कलम 370 हटवण्याला राजकीय फायद्याचाही संबंध जोडला होता. आम्ही कलम 370 हटवू असे 1950 पासून सांगत आहोत. ते बोलतात पण करत नाहीत हा त्यांचा इतिहास आहे, भाजप किंवा पीएम मोदी जे काही बोलले ते त्यांनी काळ्या दगडावरील रेघ समजून करून दाखवलं आहे. असे म्हणत ही मोदींची गॅरेंटी असल्याचं म्हटलं आहे.