आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,609 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 2,45,871 झाली आहे. आज शहरामध्ये 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या 9,869 वर पोहोचली आहे.
सीबीआयला राज्यातील खटल्यांच्या चौकशीसाठी देण्यात आलेली सर्वसाधारण संमती महाराष्ट्र सरकारने मागे घेतली आणि केंद्रीय एजन्सीला तपासाच्या उद्देशाने राज्य हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे शहरात आज एकाच दिवसात 3 हजार 581 नमुने घेण्यात आली असून शहराची एकूण टेस्ट संख्या 8 लाख 10 हजार 011 वर पोहचली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना व्हायरसचे संकट कायम असले तरी त्यावर नियंत्रण मिळण्यात काही प्रमाणात राज्य सरकारला यश येत आहे. दरम्यान, अनलॉक 5 ला सुरुवात झाली असून त्याअंतर्गत आजपासून लोकल सेवा सर्व महिलांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी खुल्या असलेल्या मुंबई लोकलमधून सर्वसामान्य महिलाही प्रवास करु शकणार आहेत. लवकरच रेल्वेने सर्वांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. यासाठी आज राज्य आणि रेल्वे सरकार यांच्यात बैठक पार पडणार आहे.
लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना व्हायरस नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना संबोधित करताना म्हटले आहे. कालच्या अपडेटनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 75,97,064 वर पोहचला आहे. त्यापैकी 67,33,328 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 7,48,538 सक्रीय रुग्ण आहेत. तर 1,15,197 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आज 21 ऑक्टोबर म्हणजेच भारतीय शहीद पोलिस स्मृती दिन. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलिस स्मारकला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.