मुंबई: येत्या 25 जानेवारीला आझाद मैदानावर होणा-या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणा-या निदर्शनात शरद पवार आणि मुख्यमंत्रीही सहभागी होणार ; 19 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मुंबईत येत्या 25 जानेवारीला होणा-या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणा-या निदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही सहभागी होणार आहेत.
मध्य प्रदेशातील 32 जिल्ह्यांत बर्ड फ्लूच्या आजारांची पुष्टी झाली आहे, तर 29 डिसेंबरपासून 3,890 कावळे आणि इतर पक्षी मृत अवस्थेत सापडले आहेत. पशुसंवर्धन मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी ही माहिती दिली.
राज्यात आज 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरु होते. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्यादेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी उद्या म्हणजेच 20 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. ही सुनावणी 25 जानेवारीला होणार होती. मात्र आता हे प्रकरण उद्याच लिस्ट झाले आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
पश्चिम बंगाल मध्ये आज दिवसभरात 412 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5,66,073 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 10,074 वर पोहोचली आहे.
सोमवारी राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यात भाजप पक्षाने 3,263 ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्राप्त केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2,999 जागांवर विजय मिळवला. याशिवाय शिवसेनेने 2,808 जागांवर भगवा झेंडा फडकवला. तसेच काँग्रेस पक्षाला 2,151 तर मनसेला 38 जागांवर समाधान मानाव लागलं. यंदा भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना आपल्या गावात सत्ता मिळवता आली नाही. त्यांना दणदणीत पराभवाला सामोर जाव लागलं. मात्र, काही नेत्यांनी आपल्या गावात गड राखला.
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सत्तांतर झालेलं पाहायला मिळालं. निवडणूक निकालानंतर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला. तसेच महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असून, जनतेची नाराजी निकालातून दिसल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं. मात्र, भाजप नेत्यांच्या या दाव्यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौल असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर ग्रामपंचायत निकालावरून टीकास्त्र उचललं आहे. महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ठाकरे सरकार म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपाची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.