ठाणे जिल्ह्यातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार 14 एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत बंद; 10 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने दि.10 एप्रिल रात्री बारा वाजेपासून मंगळवार दिनांक 14 एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत एका दिवसात 167 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये 67 आरोपींना अटक झाली असून, 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 2132 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 823 आरोपींना अटक, 94 वाहने आणि 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली आहे.
,महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे एकूण रुग्ण संख्या 1574 झाली आहे. तर कोरोनाबाधित 188 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर वैद्यकिय आणि अत्यावश्यक सेवा सुविधांमधील कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचा विमा देण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
भारतात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू तर 896 नवे रुग्ण आढळून आल्याने आकडा 6761 वर पोहचल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिली आहे.
दादर मधील शुश्रृषा रुग्णालयात 2 कोरोना बाधित नर्सेस आढळल्यानंतर या खासगी रुग्णालयातील सर्व नर्सेसला क्वारंटाईन करण्यात आले असून नव्या रुग्णांना दाखल करायचे नाही असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
कोरोना व्हायरस संपूर्ण देशाला गिळंकृत करत चालला असून दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. या पार्श्वभूमिवर अमृतसर मधील जालियनवाल बाग स्मारक 15 जूनपर्यंत बंद राहणार आहे. येथील नूतनीकरणाचे काम मार्च 2020 मध्येच पूर्ण झाले आहे, COVID-19 मुळे हे स्मारक 15 जून पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.
राजस्थानमध्ये 57 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यातील 15 रुग्ण हे जयपूर येथून तर 12 रुग्ण बन्सवारा येथून मिळाले आहेत. यामुळे येथील कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 520 वर जाऊन पोहोचली आहे. ही माहिती राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोनासारख्या महाभयाण विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हैदोस घातला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1364 झाली आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. असे असताना देखील लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून येस बँक घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या वाधवान कुटुंबातील (Wadhawan Family) 23 जण कोरोना लॉक डाऊन दरम्यान मुंबईहून महाबळेश्वरला गेले होते. इतकेच नव्हे तर त्यांना परवानगी देणारे हे महाराष्ट्राचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता होते. या घटनेची दखल घेत अमिताभ यांना चौकशी होईपर्यंत त्यांना तातडीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याचे माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असेही सांगितले आहे.
राज्यात एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे. कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत (Mumbai) आज कोरोना विषाणू संक्रमणाची 79 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, शहरातील एकूण कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 775 झाली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचे एकूण 5865 कोरोनाबाधित रुग्ण असून 169 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 478 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.