Artist Imroz Passes Away: प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांच्यासोबत इमरोजचे त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास नाते होते. त्याची आणि अमृता प्रीतमची प्रेमकहाणी जगभर प्रसिद्ध आहे. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की लग्न न करता 40 वर्षे एकत्र राहिले.

Imroz And Amrita Pritam (PC - Instagram)

Artist Imroz Passes Away: अखेर आज अमृता प्रीतम (Amrita Pritam) आणि इमरोजची (Imroz) प्रेमकहाणी संपुष्टात आली आहे. प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांनी जगाचा निरोप घेतला. आज त्यांनी वयाच्या 97 व्या वर्षी मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला त्यांचे जवळचे मित्र आणि कवी अमिया कुंवर यांनी दुजोरा दिला. अमियाच्या म्हणण्यानुसार, इमरोज हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 2 दिवसांपूर्वी त्यांना घरी आणण्यात आले. परंतु, आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे. मुंबईत त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.

इमरोज आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकहाणी -

प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांच्यासोबत इमरोजचे त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास नाते होते. त्याची आणि अमृता प्रीतमची प्रेमकहाणी जगभर प्रसिद्ध आहे. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की लग्न न करता 40 वर्षे एकत्र राहिले. इमरोज अमृता प्रीतमच्या शेवटच्या काळातही त्यांच्यासोबत राहिला. 31 ऑक्टोबर 2005 रोजी अमृताचे निधन झाले. अमृता त्याला जीत म्हणायची. अमृता-इमरोजच्या वयात सात वर्षांचा फरक होता. अमृताच्या मृत्यूनंतर इमरोज कवी झाला. अमृताने तिच्या शेवटच्या क्षणी इमरोजसाठी एक कविता लिहिली होती. या कवितेचे शब्द होते. मैं तुम्हे फिर मिलूंगी… तसेच इमरोजने अमृतासाठी एक कविताही लिहिली होती, ज्याच्या सुरुवातीला हे शब्द होते, 'उसने जिस्म छोड़ा है, साथ नहीं…'

दरम्यान, 1926 मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या इमरोजचे खरे नाव इंद्रजीत सिंग होते. लाहोरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अमृताने हे जग सोडल्यापासून इमरोज अज्ञाताचे जीवन जगत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी कोणालाही भेटणे बंद केले होते.

अमृता तिच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी डिझाइन शोधत होती. याच काळात त्यांची इमरोजशी भेट झाली. यानंतर फाळणीमुळे दोघेही पाकिस्तानातून भारतात आले आणि इथेच स्थायिक झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement