Madhubala Death Anniversary: अन् मधुबाला-दिलीप कुमार यांच्या नात्यात दुरावा आला!

बॉलिवूडची सौंदर्यवती, अभिनेत्री मधुबाला यांचे 23 फेब्रुवारी 1969 ला वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या 50 वा स्मृतीदिन आहे.

Madhubala Death Anniversary: अन् मधुबाला-दिलीप कुमार यांच्या नात्यात दुरावा आला!
Madhubala's memorable onscreen avatars (Photo Credit: File Photo)

Madhubala Death Anniversary: बॉलिवूडची सौंदर्यवती, अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांचे 23 फेब्रुवारी 1969 ला वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झाले. आज त्यांचा 50 वा स्मृतीदिन आहे. हृदयाच्या आजाराने (Congenital heart disease) या सौंदर्यवतीचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वीचे काही दिवसही त्यांचे अत्यंत दुःखात गेले. ज्या मधुबालाला बॉलिवूडने डोक्यावर घेतले त्यांनीच शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

मधुबाला जेव्हा अत्यंत आजारी होत्या तेव्हा त्यांना भेटायला कोणी येत नसे, यामुळे त्या फार दुःखी होत. मरणाला टेकलेल्या असतानाही बॉलिवूड मंडळींनी त्यांची भेट घेऊ नये, हे अत्यंत खेदकारक होते. त्यानंतर त्यांनी नीटनेटके राहणे, तयार होणेही बंद केले होते. त्या काळात कायम नाईट गाऊन मध्ये असतं आणि 23 फेब्रुवारी 1969 साली बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीने जगाला अखेरचा निरोप दिला. तेव्हा त्यांचे वय केवळ 36 वर्षे होते. मधुबाला यांचा जन्म प्रेमदिनी म्हणजे 14 फेब्रुवारी 'व्हेलेंटाईन डे' ला झाला होता. मात्र त्यांना आयुष्यात खरे प्रेम मिळाले नाही. वेलेंटाइन डे दिवशी जन्मलेल्या 'मुगल-ए-आजम'ची अनारकली मधुबाला यांची झलक 'गुगल डुडल'वर!

यामुळे तुटले दिलीप कुमार यांच्यासोबतचे नाते

मधुबाला यांची बहीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्यासोबतचे मधुबाला यांचे नाते कोणत्याही सिनेमामुळे किंवा वडिल अताउल्लाह खान यांच्या जिद्दीमुळे तुटले नाही. 'बकौल मधुर' या सिनेमाचे काही शूटिंग पूर्ण केल्यानंतर मधुबाला यांना निर्मात्यांनी राहिलेल्या शूटिंगसाठी ग्वालियर पाठवण्याचे ठरवले. मात्र तो भाग फारसा सुरक्षित नसल्याने मधुबाला यांच्या वडीलांनी शूटिंगचे लोकेशन बदलण्यास सांगितले. मात्र निर्मात्यांना ते मान्य नव्हते. तेव्हा वडीलांनी मधुबाला यांना सिनेमा सोडण्यास आणि निर्मात्यांचे पैसे परत करण्यास सांगितले. त्या दरम्यान मधुबाला-दिलीप कुमार यांचा साखरपूडा झाला होता. त्यामुळे निर्मात्यांनी दिलीप कुमार यांना मधुबाला यांची मनधरणी करण्यास सांगितले. दिलीप कुमार यांनी देखील मधुबाला यांची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र वडीलांविरोधात जाण्यास मधुबाला यांनी नकार दिला. त्यानंतर चोप्रा प्रोडक्शनने मधुबाला यांच्या विरोधात केस केली. ती केस जवळपास वर्षभर चालली आणि याच दरम्यान मधुबाला-दिलीप कुमार यांच्या नात्यात दुरावा आला. जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी

दिलीप कुमार यांनी वडीलांची माफी मागावी, अशी मधुबाला यांची लग्नासाठीची अट होती. मात्र दिलीप कुमार यांनी त्यास नकार दिला. कदाचित दिलीप कुमार यांच्या एका माफीमुळे दोघांचेही आयुष्य बदलले असते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळचे होते.

आजारपणात किशोर कुमार यांनी केले दुर्लक्ष

मधुबाला यांची बहीण मधुर भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुबाला आजारी असताना उपचारासाठी त्यांना लंडनला घेऊन जाण्याचा विचार होता. तेव्हाच त्यांना किशोर कुमार यांनी प्रपोज केले. मात्र वडीलांचा आग्रह होता की, मधुबाला यांनी डॉक्टरी उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन मग लग्न करावे. मात्र दिलीप कुमार यांच्याशी नाते तुटल्याच्या रागात त्यांनी किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले. 1960 साली 27 वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली.

मात्र कालांतराने त्यांची प्रकृती अधिक खालावली. डॉक्टरांनी त्यांचे काहीच दिवस उरलले आहेत, असे सांगितल्यावर किशोर कुमार यांनी मुंबईतील कार्टर रोड येथे बंगला खरेदी केला आणि त्यांना नर्स, ड्रायव्हरसोबत तिथे सोडले. चार महिन्यांत त्यांनी केवळ एकदाच मधुबाला यांची भेट घेतली. अखेरीस त्यांनी मधुबाला यांचे फोन घेणे देखील बंद केले.

सौंदर्य, हास्य, अभिनय आणि अदा यामुळे प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या या सौंदर्यवतीच्या नशीबात खरे प्रेम काही नव्हते. मधुबाला यांना करिअरमध्ये मोठे यश लाभले. मात्र त्यांचे खाजगी आयुष्य अडीअडचणींनी भरलेले राहीले. त्यामुळे त्यांना 'ट्रेजडी क्वीन' देखील म्हटले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2019 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).