नाना पाटेकर यांच्या 'नाम फाऊंडेशन'कडून कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार; तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता (Photo Credits : Yogen Shah)

मागचे वर्षे हे तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या मुद्द्यामुळे प्रचंड गाजले. अभिनेत्री तनुश्री दत्ता आता पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत समोर आली आहे, तिने पुन्हा नाना पाटेकरांवर हल्ला केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, 'जोपर्यंत मी माझ्यासोबत घडलेल्या प्रकारचा बदला घेत नाही, तोपर्यंत मी नाना पाटेकर यांना सोडणार नाही.' यावेळी तिने गणेश आचार्य हा मुख्य आरोपी असल्याचेही सांगितले. मंगळवारी तनुश्री दत्ता आणि तिचे वकील नितीन सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पत्रकार परिषदेत अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा नाना पाटेकरांवर अनेक गंभीर आरोप केले. ती म्हणाली, 'नाना पाटेकर यांचे वकील नीलेश पावसकर यांनी माझी फसवणूक केली आहे. ते नाना पाटेकर यांचे वकील आहेत हे त्यांनी मला सांगितले नाही. त्यांनी मला भेटून माझ्याकडून सर्व कागदपत्रे घेतली. त्यांच्या मित्राद्वारे त्यांनी माझ्याकडे वकील होण्यासाठी संपर्क साधला होता. नाना पाटेकर आणि त्यांचे वकील मला सतत त्रास देत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) लोकांनीही मला त्रास दिला.'

तनुश्री दत्ताने नाम फाऊंडेशनवरही (Naam Foundation) गंभीर आरोप केले आहेत. फाऊंडेशन आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली कोट्यावधी रुपये नाना पाटेकर यांच्याकडे आले आहेत. मात्र या पैशांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरे देणार होते, त्याचे काय झालं? कोणी जाऊन बघितले?' सोबतच नाना पाटेकर हे दुसरे आसाराम बापू असल्याचेही तिने म्हटले आहे. तनुश्रीने पोलिसांवरही या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला. 17 जानेवारी रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पाडणार आहे.