Sambhaji Chhatrapati's letter to CM: 'MPSC विद्यार्थ्यांना 2 वर्ष वाढीव संधी द्या'; संभाजी छत्रपती यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
एमपीएससी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष वाढीव संधी देण्याची मागणी केली आहे.
एमपीएससी परीक्षांच्या (MPSC Exam) पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष वाढीव संधी देण्याची मागणी केली आहे. मागील दोन वर्षात कोविडमुळे एमपीएससी परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचा काहीही दोष नसताना त्यांची संधी हिरावून घेतली जात आहे. त्यामुळे शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २ वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच वयोमर्यादा वाढवून देण्याची ग्वाही शासनाने यापूर्वी दिली असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली आहे.
संभाजीराजे यांनी पत्रात लिहिले की, "कोविड-19 मुळे मागील 2 वर्षात नोकर भरतीसाठी नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात न आल्याने खुल्या गटासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनी आपली वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना आता नुकत्याच MPSC द्वारे नवीन जाहिराती प्रसिद्ध होत असलेल्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाही."
"हे उमेदवार मागील 3-4 वर्षांपासून सरकारी नोकरीसाटी अभ्यास करीत आहेत. मागील 2 वर्षात जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असल्याने त्यांची परीक्षा देण्याची संधी काही चूक नसताना हिरावून घेतली जात आहे. यांचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन 2 वाढीव संधी उपलब्ध करुन द्याव्यात," अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे अधिक नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (MPSC Exam साठी परीक्षार्थी आणि अधिकाऱ्यांना 30 व 31ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी)
संभाजी छत्रपती ट्विट:
मागील २ वर्षात कोविडमुळे MPSC परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा वाढवून देण्याची ग्वाही शासनाने दिली होती. ती अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. काहीही दोष नसताना तयारी करूनही विद्यार्थी 'एजबार' होत आहेत. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २ वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घ्यावा. pic.twitter.com/4sKWDYGOWA
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 29, 2021
दरम्यान, 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना दोन संधी उपलब्ध करुन द्याव्या, अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच देशातील विविध राज्यांमध्ये उमेदवाराच्या हिताचा निर्णय घेऊन वाढीव संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी पत्राद्वारे सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 07:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

