Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवेला पुन्हा विलंब, आता नवी तारीख समोर

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम आणि तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना उद्घाटनाची तारीख पुन्हा लांबणीवर पडली असून आता सप्टेंबर महिन्यात सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Metro | Twitter

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि बहुतांश प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू न झाल्याने विशेषतः राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या हजारो माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे. आता ही सेवा सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची नवी शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

तांत्रिक मंजुरीनंतरही उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर

हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गावरील अनेक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) पाहणी, ट्रॅकवरील चाचण्या तसेच सौरऊर्जेसह आवश्यक त्या पायाभूत सुविधा सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही प्रत्यक्ष गाड्या अद्याप यार्डातच उभ्या असून, उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत.

आयटी कर्मचाऱ्यांचा संयम संपला

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. वाकड, बाणेर, पाषाण आणि विद्यापीठ चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना दररोज तासन्‌तास रस्त्यावर अडकून राहावे लागते. मेट्रो सेवा सुरू झाल्यास या गर्दीतून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र वारंवार उद्घाटनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने आयटीयन्स आणि नियमित प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबरच्या पंधरवड्यात सेवेची शक्यता

मेट्रो प्रशासनाकडून आता सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पंधरवड्यात मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन केले जात आहे. उर्वरित स्थानकांवरील अंतिम फिनिशिंगची कामे, प्रवासी सुविधा आणि जोड रस्ते तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मेट्रो काही महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान धावणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाईल.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा मार्ग

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. हा मार्ग पूर्णपणे सुरू झाल्यानंतर पश्चिम पुण्यातील रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रणासह प्रवासाचा वेळ वाचण्यास मोठी मदत होईल. मात्र प्रत्यक्ष सेवा कधी सुरू होते, याकडे आता सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement