Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे श्रेय सर्वांचेच- अजित पवार
दीर्घ काळाच्या लढ्यानंतर मराठा आरक्षणाला मंजूरी मिळाल्यानंतर अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मंजूरी मिळाल्यानंतर काही राजकारणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असून ते चुकीचे असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. दीर्घ काळाच्या लढ्यानंतर मराठा आरक्षणाला मंजूरी मिळाल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. तसंच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्याचा विसर पडू देऊ नका, असेही ते यावेळी म्हणाले. मराठा समाजाच्या अथक प्रयत्नांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे आरक्षणाचे श्रेय सर्वांचेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा आंदोलकांचीही भेट घेतली.
मराठा आंदोलनादरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांचे गुन्हे सरकारने कोणत्याही अटीशिवाय मागे घ्यावेत. तसंच मराठा आरक्षणादरम्यान ज्यांनी आपले प्राण गमावले अशा आंदोलकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. ती मदत आंदोलकांना लवकरात लवकर मिळावी, अशा मागण्याही अजित पवार यांनी केल्या आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आज यश मिळालं आहे. विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विधेयकाला कोणत्याही चर्चेविना मंजुरी देण्यात आली आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षण स्तरावर मराठा समाजाला स्वतंत्र वर्गातून 16% आरक्षण ( Maratha quota) देण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2018 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

