Mahajanadesh Yatra: नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश निश्चित; मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजानदेश यात्रा सुद्धा आता तिसऱ्या टप्प्यात आहे, आज (17 सप्टेंबर) रोजी ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यांनी आपल्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली तसेच आपला पक्ष देखील भाजपात विलीन करणार असल्याचे म्हंटले आहे.

Mahajanadesh Yatra: नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश निश्चित; मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात मोठी घोषणा
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) आधी सर्व राजकीय पक्षांनी राज्यव्यापी दौऱ्यास प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाजानदेश यात्रा (Mahajanadesh Yatra) सुद्धा आता तिसऱ्या टप्प्यात आहे, आज (17 सप्टेंबर) रोजी ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे (Narayan Rane) यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. प्राप्त माहितीनुसार राणे यांनी आज सिंधुदुर्गात (Sindhudurg) महाजानदेश यात्रेचे स्वागत करताना दोन मोठ्या घोषणा केल्या, ज्यानुसार, शिवसेना (Shivsena)  आणि भाजपा (BJP)  यांच्या मध्ये कितीही वाद असले तरी आपण येत्या काहीच दिवसात भाजपात दाखल होणार असल्याचा विश्वास राणे यांनी दर्शवला तसेच, आपला पक्ष म्हणजेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा भाजपात विलीन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

महाजनादेश यात्रेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी हा महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यानुसार काही दिवसात मुंबई येथे एक कार्यक्रम घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी घोषित केले. तसेच यासाठी शिवसेना आणि भाजपा मध्ये वाद असू शकतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याने शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही असेही राणे यांनी म्हटले आहे. आपण भाजपात गेल्याने त्यांचे पारडे जड होणार आहे असा आत्मस्तुतीचा दावा देखील राणे यांनी केला.

नारायण राणे यांनी जरी महाजानदेश यात्रेचे स्वागत केले असले तरी त्यांची व्यासपीठावर उपस्थिती नव्हती, यावर उत्तर देताना जर मला महाजनादेश यात्रेत येण्याचे निमंत्रण मिळाले असते तर मी नक्कीच या यात्रेत सहभागी झालो असतो मात्र निमंत्रण अभावी आपण व्यासपीठावर जाणे टाळले असे त्यांनी स्प्ष्ट केले. यासोबतच येत्या विधानसभेत आपण निवडणूक लढवणार नसलो तरी, नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते भाजपाच्या बाजूनेच निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

दरम्यान, महाजानदेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 सप्टेंबर रोजी अकोले येथून झाला होता. सभांच्या मध्येच कधी हभप इंदुरीकर महाराजांची उपस्थिती, तर कधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलेली कोंबडेफेकी यामुळे यात्रा चर्चेचा विषय ठरली होती. येत्या गुरुवारी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्याच्या समारोप होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2019 11:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).