Mumbai Water Price: मुंबईत 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता, दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे
पाणीपट्टी दरवाढीचा हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.
मुंबईकरांना आणखीन महागाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मुंबईच्या पाणीपट्टीत सहा ते सात टक्के वाढ (Mumbai Water Price) होणार आहे. येत्या 16 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाणीपट्टी दरवाढीचा हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे (BMC Commissioner) अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांचे पाणी महागणार आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून उपसण्यात येणाऱ्या पाण्यासाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात होत असलेली वाढ, या सगळ्यांचा विचार करून मुंबईची पाणीपट्टी सहा ते सात टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. प्रतिवर्षी आठ टक्क्यांनी वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने याआधीच प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार आता, पाणीपट्टी दरात वाढ होणार आहे. प्रति हजार लीटर मागे 25 पैसे ते चार रुपयांची दरवाढ होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणूक आणि प्रशासकाकडे असलेला कारभार पाहता दरवाढीचा निर्णय होणार की दरवाढीच्या प्रस्तावाचा पुनर्विचार होईल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर सध्या राज्य सरकारचे नियंत्रण आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईकरांसाठी मागील काही दिवसांपासून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जर असा निर्णय झाला तर मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)