Mumbai: 'पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामातून कार्यमुक्त, पावसाळी कामांवर परिणाम होणार नाही'; वृत्तपत्रांमधील बातम्यांवर प्रशासनाचे स्पष्टीकरण

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अनुषंगाने निवडणूक कामकाजाकरिता मुंबई महानगर पालिकेतील अत्यावश्यक, आपत्कालीन विभाग सोडून उर्वरित विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणुकीच्या कामाकरिता देण्याबाबत यापूर्वीच विनंती केली होती.

Mumbai: 'पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामातून कार्यमुक्त, पावसाळी कामांवर परिणाम होणार नाही'; वृत्तपत्रांमधील बातम्यांवर प्रशासनाचे स्पष्टीकरण
BMC (File Image)

मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक कामातून  सुटका नाही व त्यामुळे विविध पावसाळी कामांवर परिणाम होण्याची शक्यता, अशा आशयाच्या बातम्या वारंवार  वृत्तपत्रातून  प्रसारित होत होत्या. यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊन आरोग्य विषयक भीती निर्माण होऊ नये, म्हणून याबाबत मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अनुषंगाने निवडणूक कामकाजाकरिता मुंबई महानगर पालिकेतील अत्यावश्यक, आपत्कालीन विभाग सोडून उर्वरित विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा  निवडणुकीच्या कामाकरिता देण्याबाबत यापूर्वीच विनंती केली होती.

त्यानुसार घनकचरा व्यवस्थापनातील प्रमुख अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:स्सारण प्रचालन आणि प्रकल्प, रस्ते आणि वाहतूक अशा विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक कामाकरिता अधिग्रहीत केल्या नाहीत. मुंबई शहरातील मतदान 20 मे 2024 रोजी पार पडले. मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले.

मतमोजणी प्रक्रिया 4 जून रोजी पूर्ण झाली.त्यानंतर उर्वरित विधानसभा मतदारसंघ कार्यालयाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून, कार्यालयात अहवाल सादर करावा. असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी काढले होते. त्यानुसार अहवाल ही प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा आणि मनुष्यबळ व्यवस्था मुंबई शहर यांनी कळविले आहे. (हेही वाचा: Mumbai Pothole Menace: तक्रार केल्यानंतर 24 तासांत बुजवले जाणार मुंबईमधील खड्डे; BMC चे आश्वासन)

तसेच भारत निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला असून सदर निवडणूक 26 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या कामासाठी काही अंशी अत्यंत कमी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत. ते पूर्ण वेळ नाहीत. आपल्या मूळ कार्यालयाचे कामकाज सांभाळून आठवड्यातील फक्त दोन दिवस काही वेळ निवडणूक कामकाजावर आहेत. यामध्ये आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा सोडून इतर विभागाचा समावेश आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2024 08:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).