Mumbai: 'महाराष्ट्रात भाजपचे सरकार त्यामुळे मारवाडीच बोला'; दुकानदाराचा ग्राहकावर दबाव, MNS कार्यकर्ते आक्रमक (Video)

महिलेने मलबार हिलच्या मनसे कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रार केली असता, काल मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला समज दिली व मराठी समाजाची माफी मागायला सांगितली. पोलिसांनी ही माहिती दिली.

MNS Workers Slap Shopkeepers in the Girgaon Area (Photo Credits: X/@indrajeet8080)

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबईत (Mumbai) मराठी (Marathi) सक्तीबाबत मनसे आक्रमक आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत सक्तीही केली गेली आहे. अशात आता मुंबईमध्ये एका दुकानदाराने महिलेला मराठीऐवजी मारवाडीतच  बोलण्यास सांगितले आहे. ही घटना समोर आल्यानंतर गदारोळ निर्माण झाला. किराणा व्यावसायिकाने, ‘राज्यात आता भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे मराठीत नाही तर मारवाडीत बोलावे लागते’, असे सांगितल्याचा आरोप एका महाराष्ट्रीयन महिलेने केला आहे. ही बाब मुंबईमधील गिरगावात घडली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या व्यावसायिकाला मारहाण केली.

महिलेने मलबार हिलच्या मनसे कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रार केली असता, काल मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला समज दिली व मराठी समाजाची माफी मागायला सांगितली. पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी ही महिला एका मारवाडी व्यावसायिकाच्या दुकानात किराणा सामान घेण्यासाठी गेली होती. तेव्हा मारवाडी दुकानदाराने तिला मराठी ऐवजी मारवाडीत बोलण्यास सांगितले. यामुळे महाराष्ट्रीयन महिला ग्राहक नाराज झाली. तिने त्याबाबत स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तक्रार केली होती, मात्र तेथून प्रतिसाद न मिळाल्याने तिने मलबार हिल येथील मनसे शाखेकडे तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काल त्या दुकानदाराला आपल्या शाखेत बोलावून शिवीगाळ करत महिला व मराठी समाजाची माफी मागायला सांगितली. (हेही वाचा: अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? शिंदेंआधी दादांनी दिलं उत्तर आणि सार्‍यांनाच हसू अनावर)

MNS Workers Slap Shopkeepers in the Girgaon Area-

या घटनेचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुकानदाराने महिलेची आणि मराठी समाजाची माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले. दरम्यान, राज्यातील 288 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष मनसेची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. आता मोठी बातमी समोर येत आहे की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यताही रद्द होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करू शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement