#MeToo : अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठावायला हवा : सिंधुताई सकपाळांचं #MeToo वर टीकास्त्र
10 वर्षांनी अशाप्रकारे बोलणं, मत व्यक्त करणं चूकीचं आहे. अत्याचार झाला की ताबडतोब त्याविरूद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया #MeToo वर सिंधुताईंनी दिली आहे.
अनाथांची माय अशी ओळख असणार्या माई म्हणजेच सिंधुताई सकपाळ यांनीही #MeToo चळवळीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हॉलिवूडपासून सुरू झालेली चळवळ आता बॉलिवूड, राजकीय मंडळी, कलाकारांपर्यंत पोहचली आहे. यामुळे अनेकींना आत्मविश्वासाने बोलण्याचं धाडस झालं आहे. मात्र सिंधुताई सकपाळांनी 10 वर्षांनंतर अत्याचाराबददल बोलणं निरर्थक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सिंधुताईंची प्रतिक्रिया
सिंधुताईंनी शेवगाव येथे पत्रकारांशी बोलताना #MeToo मोहिमेबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. जेव्हा त्रास होतो तेव्हाच त्याच्याबद्दल बोलावं. 10 वर्षांनी अशाप्रकारे बोलणं, मत व्यक्त करणं चूकीचं आहे. अत्याचार झाला की ताबडतोब त्याविरूद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे.
#MeToo मुळे अनेक जुनी प्रकरण आता समोर येत आहेत. आरोप करणारी व्यक्ती जशी कुणाची आई, बहिण, मुलगी, सून असते तसाच तो पुरूषही आता कुणाचा मुलगा, वडील, भाऊ आहे. अनेकांना आता या मोहिमेमुळे विनाकारण शिक्षा भोगावी लागेल, मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
सध्या #MeToo च्या मोहिमेमुळे नाना पाटेकर, साजिद खान, अनु मलिक, विकास बहल, चेतन भगत, कैलाश खेर इत्यादींची नावं पुढे आली आहेत.