Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक; लॉंगमार्चच्या तयारीला लागण्याचे आवाहन
खासदार संभाजी राजे यांनी सरकार सोबत चर्चेचा आता विषयच नाही असं म्हणत पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. 25 ऑक्टोबर पासून ते महाराष्ट्र दौर्यावर आहेत.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. सध्या या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांकडे टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर नाराज असलेल्या खासदार संभाजी राजे (Sambhaji Chhatrapati) यांनी राज्य सरकारवर टीक करत आता मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) प्रश्नी पुन्हा आपला आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी सध्या रायगड मधून त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी मराठा समाजाने लाँगमार्चच्या तयारीला लागावे, असे आवाहन देखील केले आहे.
मराठा समाजाचं आरक्षण यासोबतच इतर मागण्या त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत पण सरकार या सार्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढण्याची तयारी करावी, असे खासदार संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: 127th Constitution Amendment Bill: राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल, 50% आरक्षण मर्यादेचे त्रांकडे अद्यापही कायम .
संभाजी राजे ट्वीट
"....मराठा समाजाने लॉंगमार्चच्या तयारीला लागावं..."
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांवर सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लॉंगमार्च काढण्याची तयारी करावी.... pic.twitter.com/FDkYO1OcKo
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 26, 2021
संभाजी राजेंच्या राज्यव्यापी दौरा 25 ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे. 'महाराष्ट्र राज्य सरकार आपली जबाबदारी पाळत नसल्याचं सांगत सरकारला आम्ही अल्टिमेटमही दिलं होतं. मात्र, सरकारनं दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता चर्चेला जागा नाही, असे सांगत त्यांनी पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आवेदन दिले होते. कोरोना संकटात त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचं आवाहन केले होते. पण आता सरकार केवळ ते कारण पुढे करत असल्याचं सांगत सरकारच्या उदासीन भूमिकेवर हल्लाबोल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी संभाजीराजेंनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. 'अनेक दशकं आर्थिक दारिद्रयात असलेला मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागास आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे आवश्यक आहे' अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

