महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असून, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ या दिवसासाठी पावसाचा सुधारित इशारा जारी केला आहे. पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार, उद्याच्या दिवशी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

४ ऑगस्टसाठी नेमका इशारा काय?

हवामान विभागाच्या नकाशानुसार, ४ ऑगस्ट रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. ३ ऑगस्टच्या तुलनेत हा यलो अलर्ट अधिक विस्तारलेला दिसत असून, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, साताऱ्यासह घाटमाथ्यावरील भागांचा त्यात समावेश आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र सर्वसाधारण पावसाची स्थिती राहणार असून, तेथे कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

दक्षिण कोकण-गोव्यातही सतर्कतेचा सल्ला

उत्तर कोकणासोबतच दक्षिण कोकण आणि गोवा जिल्ह्यांतही पावसाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्यालगतच्या किनारपट्टी भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. ३ ऑगस्टला या भागात दिसलेला नारिंगी (अलर्ट) पट्टा ४ ऑगस्टला तो सौम्य होऊन पिवळ्या पातळीवर आल्याचे दिसते, म्हणजेच तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे, मात्र सतर्कता कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

विदर्भातील पावसाची तीव्रता उद्यापासून कमी होऊन हवामान अधिक कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ४ ऑगस्टपासून विदर्भात पावसाचा जोर हळूहळू ओसरण्याची शक्यता आहे, मात्र यलो अलर्ट असलेल्या भागांत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. केवळ कोकण आणि घाट परिसरच नव्हे, तर विदर्भातील काही जिल्ह्यांतही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  बुलढाणा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत हवामान अधिक कोरडे होण्याचा अंदाज आहे.

पहा 4 ऑगस्टला यलो अलर्ट कुठे?

पुढील काही दिवसांचा कल

हवामान विभागाने दिलेल्या पाच दिवसांच्या इशाऱ्यानुसार, ५ आणि ६ ऑगस्ट रोजीही मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात पिवळ्या पातळीचा इशारा कायम राहण्याची शक्यता आहे, तर ७ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होऊन बहुतांश भागांत सर्वसाधारण स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

यलो अलर्ट चा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. घाट परिसरातील प्रवाशांनी प्रवासापूर्वी हवामानाचा आणि रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घ्यावा. सखल भागातील तसेच दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मच्छिमारांनीही समुद्रकिनारी भागात हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.