मविआच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर सडकून टिका
"महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे" अशी जहरी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधा-यांवर केली आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट दुप्पट वेगाने आली असून थैमान घालत आहे तर दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर टिका करण्यात मश्गुल आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांमध्ये चांगलीच जुंपलीय. राज्यातील वैद्यकिय यंत्रणा, कोरोना लस, ऑक्सिजन पुरवठा यावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान "महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे" अशी जहरी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधा-यांवर केली आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा एक व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी शेअर करुन त्यावर ट्विट केले आहे. "खुल्या बाजारात रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले टाकून राज्यांना मदत केली आहे.राज्याला संपूर्ण कोटा हा तर्काधारित असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रालाच झाला आहे. मविआच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे." असे देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा-Oxygen Shortage in Maharashtra: 'ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे'; आरोग्यमंत्री Rajesh Tope
दरम्यान राज्यात रेमडेसिवीर (Remdesivir) औषधांसह इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीत मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राजकारण रंगत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद होत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विनंती पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 'रेमडेसिवीर आणि इतर कोरोना औषधे आणि साहित्य खरेदी-वितरणाचे अधिकार राज्यांना द्यावेत,' अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.