औरंगाबाद मध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आजपासून कडक लॉकडाऊन लागू
कोरोना रुग्णांचे हे वाढते आकडे पाहता आज, 10 जुलै पासून पुढील आठ दिवस म्हणजेच 18 जुलै पर्यंत औरंगाबाद मध्ये कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई सहितच अनेक अन्य जिल्ह्यात सुद्द्धा दिवसापाठी शेकडो नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत, यातीलच एक जिल्हा म्हणजे औरंगाबाद (Aurangabad). आज, 10 जुलै रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अपडेटनुसार जिल्ह्यात 160 रुग्णांचे (86 पुरूष, 74 महिला) अहवाल मागील 24 तासात पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्णांचे हे वाढते आकडे पाहता आज, 10 जुलै पासून पुढील आठ दिवस म्हणजेच 18 जुलै पर्यंत औरंगाबाद मध्ये कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर व वाळूज परिसरात हे लॉकडाऊन (Lockdown) लागू असून याचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केले आहे. या काळात सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, आस्थापना बंद असतील.
औरंगाबाद पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी संलग्न असणारी औषधाची दुकाने लॉक डाऊन मध्ये सुद्धा सुरू राहतील. बंद दरम्यान महापालिकेमार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याद्वारे अधिकाधिक रुग्ण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पहा ट्विट
दरम्यान, आतापर्यंत औरंगाबाद मध्ये 7832 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4162 बरे झाले, 338 जणांचा मृत्यू झाला. तर 3332 जणांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा आता जवळपास ३ लाखावर पोहचण्याचा मार्गी आहे. सध्या राज्यात कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे.