Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी
संतोष राठोड भावाच्या लग्नासाठी जालना येथे मूळगावी आले होते. लग्न झाल्यानंतर मुंबईच्या विरार येथे परतत असताना हा अपघात झाला.
समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघात हे सुरुच आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातात जालन्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत, तर 5 जण जखमी आहेत. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला. (हेही वाचा - Mumbai Shocker: धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईच्या ग्रँड रोड येथील घटना)
अपघातातील मृतांमध्ये पती, पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृत जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी आहेत. संतोष अशोक राठोड (35) त्यांची पत्नी वर्षा संतोष राठोड (29) आणि मुलगी अवनी संतोष राठोड दीड वर्ष अशी मयतांची नावे आहे.
संतोष राठोड भावाच्या लग्नासाठी जालना येथे मूळगावी आले होते. लग्न झाल्यानंतर मुंबईच्या विरार येथे परतत असताना हा अपघात झाला. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी झालेल्या अपघातात नवरदेव कृष्णा राठोड (27) आणि त्याची पत्नी कोमल राठोड (19) हे देखील जखमी झाले आहे. संतोषची आई बताबाई राठोड (65) यांच्यावर उपचार सुरू आहे. जीपने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मयतांचे शव शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2023 02:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

