मुंबई: स्वराज्य स्थापनेच्या कार्यात आपले सर्वस्व अर्पण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सुभेदार, नरवीर तानाजी मालुसरे यांची आज (4 फेब्रुवारी) पुण्यतिथी साजरी केली जात आहे. 1670 मध्ये कोंढाणा (सिंहगड) किल्ला मुघलांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी तानाजींनी दाखवलेले धाडस आणि दिलेले बलिदान आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. "आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन रायबाचं" हा त्यांचा निर्धार मराठा इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे.
सिंहगडाचा ऐतिहासिक रणसंग्राम
Tanaji Malusare Information In Marathi- पुरंदरच्या तहामध्ये गमावलेला कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली होती. तानाजींनी केवळ ३०० मावळ्यांसह रात्रीच्या वेळी द्रोणगिरीचा कडा चढून गडावर आक्रमण केले. गडाचा किल्लेदार उदयभान राठोड याच्याशी झालेल्या भीषण युद्धात तानाजींना वीरमरण आले. मात्र, त्यांच्या बलिदानानंतर मावळ्यांनी किल्ला सर केला.
"गड आला पण सिंह गेला"
गडावर भगवा फडकला, परंतु आपला जवळचा मित्र आणि शूर सेनापती गमावल्याचे समजताच छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत भावूक झाले. त्यांनी "गड आला पण सिंह गेला" हे ऐतिहासिक उद्गार काढले. तानाजींच्या शौर्याच्या सन्मानार्थ महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' असे ठेवले.
तानाजी मालुसरे पुण्यतिथीनिमित्त काही खास संदेश:
"स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे थोर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन."
"ज्यांच्या तलवारीच्या धारेने शत्रू थरथरायचा, त्या नरवीर तानाजींच्या शौर्याला मानाचा मुजरा."
"आधी लगीन कोंढाण्याचं... हा मंत्र देणाऱ्या महापराक्रमी वीराला स्मरण्याचा आजचा दिवस."



समाधी स्थळी आणि समाजमाध्यमांवर अभिवादन
आजच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्यावर आणि रायगड जिल्ह्यातील उमरठ या तानाजींच्या जन्मगावी मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमून त्यांना अभिवादन करत आहेत. सोशल मीडियावरही "मराठा साम्राज्याच्या या अजरामर सिहाला मानाचा मुजरा" अशा आशयाचे संदेश आणि स्टेटस शेअर करून लोक आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत.