शुभकार्यात का महत्वाचे मानले जाते विड्याचे पान; जाणून घ्या धार्मिक महत्व
तुमच्यापैकी कित्येकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आम्ही गुरुजी विवेक रमेश वैद्य यांना यामागचे धार्मिक कारण आणि त्याचे महत्त्व विचारले असता त्यांनी आम्हाला पुढील माहिती दिली.
घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो विड्याच्या पानाचा. घरात पूजा किंवा लग्न, साखरपुडा यांसारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुवा पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाने कुठे आहेत? या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये विड्याला महत्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगु, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही.
म्हणूनच तुमच्यापैकी कित्येकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आम्ही गुरुजी विवेक रमेश वैद्य यांना यामागचे धार्मिक कारण आणि त्याचे महत्त्व विचारले असता त्यांनी आम्हाला पुढील माहिती दिली.
विड्याच्या पानामागची कथा:
समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.
विड्याच्या पानाचे महत्व:
-या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.
-विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" सहवास असतो.
-या विडयाच्या पानाच्या मधोमध "सरस्वती देवीचा" वास असतो.
-विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास असतो.
-या विडयाच्या पानाच्या लहान देठा मध्ये "महाविष्णूचा" वास असतो.
-विडयाच्या पानाच्या मागील बाजूस "चंद्रदेवते"चा वास असतो.
-या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये "परमेश्वरा" चा वास असतो.
-विडयाच्या पानाखाली "मृत्यूदेवते"चा वास असतो. या कारणाने ताम्बूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे.
-विडयाच्या पानाच्या देठात 'अहंकार देवता' आणि 'दारिद्र्य लक्ष्मी' राहतात. म्हणून पान सेवन करतांना देठ काढून टाकायचे असते.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा. कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा. तसेच शुभ मानली जाणारी ही विडाची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत. हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2019 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

