झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी युतीला मिळालेल्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांची अभिनंदन ट्विट
काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडी सरकारने झारखंड मध्ये बहुमत मिळवताच हेमंत सोरेन हे झारखंडचे पुढचे मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेमंत सोरेन यांच्या सहित महागठबंधन युतीला विजयासाठी अभिनंदन करणारे खास ट्विट केले आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 81 जागांपैकी 46 जागांवर विजय मिळवत काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडी सरकारने हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या विजयामुळे हेमंत सोरेन हे झारखंडचे पुढचे मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेमंत सोरेन यांच्या सहित महागठबंधन युतीला विजयासाठी अभिनंदन करणारे खास ट्विट केले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस सोबत हातमिळवणी केल्यावर हा काँग्रेसचा दुसऱ्या राज्यातील मोठा विजय आहे. दुसरीकडे शिवसेनेचा पूर्व मित्रपक्ष भाजप ला झारखंड मध्ये केवळ 25 जागांवर विजय मिळवून मोठा पराभव पत्करावा लागला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी युतीने बहुमत प्राप्त करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा असे ट्विट केले आहे.
उद्धव ठाकरे ट्विट
हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील दोन विधानसभा जागांवर (दुमका आणि बरहेट) निवडणूक लढविली. हेमंत सोरेन यांनी बरहेट मतदारसंघात 25740 मतांनी आणि दुमका जागेवर 13188 मतांच्या फरकाने विजय मिळविला.आता मुख्यमंत्री पदाच्या दिशेने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या पाठोपाठ आता दुसरे महत्वाचे राज्य भाजपच्या हातातून निसटले आहे. महाराष्ट्रात निदान सर्वाधिक मत प्राप्त असणारी पार्टी म्हणून भाजपला आपले अस्तित्व टिकवता आले होते मात्र झारखंड मधील भाजपचा पराभव हा चिंता जन्य आहे.