Monsoon 2026: मुंबईकरांना उकाड्यापासून कधी मिळणार सुटका? हवामान विभागाकडून मोसमी पावसाबाबत मोठी अपडेट
मुंबईत सध्या सुरू असलेल्या असह्य उकाड्यापासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता असून, अनुकूल परिस्थिती राहिल्यास मोसमी पाऊस ५ ते ६ जूनच्या सुमारास शहरात धडकू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई: मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे आणि हवेतील कमालीच्या दमटपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असह्य उकाड्यामुळे त्रस्त झालेले मुंबईकर सध्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, नागरिकांना या त्रासातून सुटका मिळण्यासाठी आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जर वातावरणातील सध्याची परिस्थिती अशीच अनुकूल राहिली, तर दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस (नैऋत्य मोसमी पाऊस) ५ किंवा ६ जून २०२६ च्या सुमारास मुंबईत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन वेळेवर किंवा काही अंशी लवकर झाल्याने महाराष्ट्रातही त्याचा प्रवास वेगाने होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाच्या अधिकृत सरी कोसळू शकतात, ज्यामुळे तापमानात मोठी घट होईल.
मुंबईत सध्या उकाड्याचा जोर कायम
मोसमी पाऊस उंबरठ्यावर असला तरी सध्या मुंबईकरांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. शहरात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास असले, तरी हवेतील ६0 टक्क्यांहून अधिक आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारा उकाडा (फिल्स् लाईक तापमान) ४0 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे.
दिवसभर वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस हा दमटपणा असाच जाणवत राहील, परंतु हा उकाडा म्हणजेच मोसमी पाऊस जवळ आल्याचे मुख्य संकेत मानले जातात.
मुख्य मोसमी पाऊस ५ किंवा ६ जून रोजी धडकणार असला, तरी त्यापूर्वी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (MMR) मान्सूनपूर्व म्हणजेच प्री-मान्सून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
येत्या ३१ मे आणि जूनच्या सुरुवातीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी आकाश ढगाळ राहून काही भागात हलकी ते मध्यम स्वरूपाची गाजविजांसह वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते. या मान्सूनपूर्व सरींमुळे मुंबईकरांना तात्पुरता का होईना, पण उष्णतेपासून नक्कीच दिलासा मिळेल.