Bharat Taxi Launch: अमित शाह यांच्या हस्ते देशातील पहिल्या सहकारी आणि 'सर्र्ज-फ्री' टॅक्सी सेवेचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत 'भारत टॅक्सी' या भारतातील पहिल्या सहकारी तत्वावरील टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा पूर्णपणे कमिशनमुक्त आणि 'सर्र्ज प्राईसिंग' विरहित असून चालकांनाच मालकी हक्क देणारी आहे.

भारत टॅक्सी

देशातील टॅक्सी आणि राईड-हेलिंग क्षेत्रात आज एक मोठी क्रांती झाली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) या देशातील पहिल्या सहकारी तत्वावरील प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. "सहकारातून समृद्धी" आणि "सारथी ही मालक" या संकल्पनेवर आधारित ही सेवा खाजगी कंपन्यांच्या मक्तेदारीला लगाम घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

चालकांसाठी 'शून्य कमिशन' मॉडेल

भारत टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे प्लॅटफॉर्म चालकांकडून (सारथी) कोणतेही कमिशन घेणार नाही. सध्या ओला आणि उबर सारख्या खाजगी कंपन्या प्रत्येक राईडमागे २० ते ३० टक्के कमिशन कापून घेतात. मात्र, भारत टॅक्सीमध्ये चालकांना केवळ ३० रुपये प्रति दिवस इतके अल्प शुल्क भरावे लागेल, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

प्रवाशांना दिलासा: 'सर्र्ज प्राईसिंग'ला सुट्टी

नेहमीच्या राईड-हेलिंग अ‍ॅप्सवर पावसाळ्यात किंवा गर्दीच्या वेळी भाडे दुप्पट-तिप्पट वाढते, ज्याला 'सर्र्ज प्राईसिंग' म्हणतात. भारत टॅक्सीने ही पद्धत पूर्णपणे बंद केली आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना पारदर्शक आणि स्थिर दरात प्रवास करता येणार आहे. खाजगी टॅक्सींच्या तुलनेत ही सेवा ३० टक्क्यांपर्यंत स्वस्त असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'सारथी ही मालक': चालकांना सामाजिक सुरक्षा

भारत टॅक्सी ही केवळ एक अ‍ॅप नसून 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड' (STCL) द्वारे चालवली जाणारी संस्था आहे. यात सहभागी होणारे चालक हे या सहकारी संस्थेचे भागधारक (Shareholders) असतील.

विमा संरक्षण: प्रत्येक नोंदणीकृत चालकाला ५ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा आणि ५ लाख रुपयांचा कौटुंबिक आरोग्य विमा दिला जाणार आहे.

महिला सक्षमीकरण: 'बाईक दीदी' आणि 'सारथी दीदी' या उपक्रमांतर्गत १५० हून अधिक महिला चालकांनी या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे.

विस्ताराची योजना आणि पार्श्वभूमी

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये या सेवेची यशस्वी चाचणी (Pilot Project) सुरू होती. या काळात १० लाखांहून अधिक युझर्सनी अ‍ॅप डाऊनलोड केले असून दररोज १०,००० पेक्षा जास्त राईड्स पूर्ण केल्या जात आहेत. केंद्र सरकारची योजना पुढील दोन वर्षांत ही सेवा देशातील सर्व राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये विस्तारण्याची आहे.

खाजगी कंपन्यांच्या वाढत्या भाड्यामुळे त्रस्त झालेले प्रवासी आणि कमी उत्पन्नामुळे नाराज असलेले चालक, या दोन्ही घटकांसाठी 'भारत टॅक्सी' एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement