Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच्या सुरक्षेवरुन घमासान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसह शरद पवारांचं मोठं विधान

राजकीय वर्तूळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सुरक्षेवर मोठी चर्चा रंगली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच्या सुरक्षेवरुन घमासान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसह शरद पवारांचं मोठं विधान
Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता पण उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावाही सुहास कांदे यांनी केला होता.

 

यानंतर राजकीय वर्तूळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सुरक्षेवर मोठी चर्चा रंगली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यावर प्रतिक्रीया देत अप्रत्यक्षपणे आ. सुहास कांदेच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शंभूराज देसाईच्या वक्तव्यचा हवाला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. संबंधीत वादावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणालेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जेवढी सुरक्षा दिलेली होती तेवढीचं सुरक्षा एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या काळात पुरवण्यात आली होती तरी ही चर्चा अनावश्यक चर्चा असल्याचं मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

 

तसेच राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा होती आणि आहे त्यामुळे यावर अधिक काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी नोंदवल आहे. तरी महाराष्ट्रात नवनिर्वाचीत सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी विरुध्द शिंदे गट असा सामना बघायला मिळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2022 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).