Pune Metro Line 3: माण ते बालेवाडी दरम्यान पहिल्या टप्प्याला सुरक्षा मंजुरी; सप्टेंबरमध्ये प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता
पुणे मेट्रो मार्गिका ३ मधील माण ते बालेवाडी दरम्यानच्या १२ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळाली असून, उर्वरित तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
Pune Metro Line 3 Start: पुणेकरांसाठी, विशेषतः आयटी हब हिंजवडी आणि पश्चिम भागातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या (हिंजवडी ते शिवाजीनगर) पहिल्या टप्प्यातील माण ते बालेवाडी दरम्यानच्या १२ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे हा मार्ग प्रत्यक्ष प्रवासी सेवेसाठी सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यास सप्टेंबर महिन्यात या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे.
तपासणी आणि अंतिम सुरक्षा मंजुरी
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सखोल तांत्रिक पाहणी, विविध चाचण्या आणि सुरक्षा मानकांची पूर्तता तपासल्यानंतर २३ जुलै रोजी या पहिल्या टप्प्यासाठी अधिकृत मंजुरी दिली. सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पडताळणी झाल्यानंतर ही मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी उद्घाटन आणि उर्वरित परिचालन व्यवस्थापन पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे.
वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा
हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे पुण्यातील सर्वात मोठे रोजगार केंद्र मानले जाते. दररोज हजारो कर्मचारी आणि नागरिक मध्य पुण्यातून तसेच बालेवाडी, बाणेर आणि वाकड परिसरातून येथे ये-जा करतात. पीक अवर्समध्ये या भागातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर, वेगवान आणि विश्वासार्ह मेट्रो पर्याय उपलब्ध झाल्याने रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या वाचेल.
२३.२ किलोमीटरचा एकूण प्रकल्प
पुणे मेट्रो मार्गिका ३ चा संपूर्ण प्रकल्प हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान २३.२ किलोमीटरचा असून त्यात एकूण २३ स्थानके प्रस्तावित आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित करण्यात येत असलेला हा मार्ग माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला थेट मध्य शहराशी जोडण्यासाठी आखण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात माण ते बालेवाडी दरम्यान सेवा सुरू झाल्यानंतर उर्वरित मार्गावरील (बालेवाडी ते शिवाजीनगर) कामांना गती दिली जात असून पुढील स्थानकांच्या सुरक्षा तपासणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.
टप्प्याटप्प्याने विस्तार आणि उपयुक्तता
सुरुवातीच्या टप्प्यात माण ते बालेवाडी दरम्यान सेवा सुरू झाल्याने पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना तात्काळ फायदा मिळणार असला, तरी या मेट्रोचा खरा लाभ संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावरच नागरिकांना घेता येईल. संपूर्ण मार्ग कार्यान्वित होईपर्यंत मध्य पुण्यातून येणाऱ्या अनेक प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी बस, दुचाकी अथवा इतर वाहनांवर अवलंबून राहावे लागेल. प्रशासन पुढील टप्प्यातील कामे आणि परवानग्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.