Pune Metro Line 3: प्रतीक्षा अखेर संपली! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग पुढील महिन्यात सुरू होणार

पुणेकर आणि आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील पहिल्या टप्प्याचे (माण ते बालेवाडी) उद्घाटन पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

i Metro | (Photo Credit - X)

पुणे शहर आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील लाखो नोकरदार तसेच नागरिकांचा दैनंदिन प्रवास वेगवान करणारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) आवश्यक मंजुरी मिळाली असून, राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मेट्रो सेवेचे लोकार्पण केले जाणार आहे.

दोन टप्प्यांत होणार मेट्रोचे संचालन

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) विकसित केली जाणारी ही मेट्रो सेवा दोन स्वतंत्र टप्प्यांत कार्यान्वित केली जाईल.

पहिल्या टप्प्यात माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे. या मार्गावर सर्व सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने धावण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर दरम्यानची उर्वरित सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाईल.

आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा

हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. रस्त्यावरील वाढती खासगी वाहने आणि गर्दीच्या वेळेत होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जात होता.

मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यामुळे हिंजवडी ते बालेवाडी दरम्यानचा प्रवास जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहनांचा भार कमी होऊन परिसरातील कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

प्रशासकीय तयारी पूर्ण

पुण्यातील सर्व प्रमुख मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची भूमिका राज्य शासनाची राहिली आहे. त्याअनुषंगाने आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया आणि समन्वय पूर्ण करण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी स्थानकांवरील अंतिम कामे, तिकिटिंग व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीला सेवा सुरू होताच प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक नियमित वेळापत्रकानुसार सुरू केली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement