Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 20 जानेवारीपासून 'या' 5 विभागांमध्ये 44 तास कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबई महानगरपालिकेद्वारे जलवाहिनीच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने, 20 ते 22 जानेवारी दरम्यान पाच विभागांमध्ये ४४ तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Water Cut | (Representative Image, Photo Credit: Pixabay.com)

मुंबई: मुंबईतील पाच महापालिका विभागांमधील नागरिकांना येत्या २० जानेवारीपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे (BMC) अप्पर वैतरणा जलवाहिनीच्या जोडणीचे (Cross-connection) काम हाती घेण्यात येणार असल्याने, सलग ४४ तास पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. मंगळवार, २० जानेवारी सकाळी ९ वाजेपासून ते गुरुवार, २२ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत हा बदल लागू असेल.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, के-पूर्व विभागातील २४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीवर क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे यापूर्वी मुख्य जलवाहिनीचा मार्ग बदलण्यात आला होता. आता ही नवीन जलवाहिनी जुन्या नेटवर्कशी जोडली जाणार आहे. या तांत्रिक कामामुळे मुंबईच्या मध्य आणि उपनगरीय भागांतील पाच विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

बाधित होणारे विभाग आणि परिसर

या ४४ तासांच्या कामामुळे मुंबईतील खालील पाच वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल:

जी-उत्तर विभाग: धारावी, दादर, माहीम आणि माटुंगा परिसर.

के-पूर्व विभाग: मरोळ, चकाला, एअरपोर्ट रोड आणि सहार परिसर (अंधेरी पूर्व).

एस विभाग: विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडुप परिसर.

एच-पूर्व विभाग: वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि सांताक्रूझ पूर्व.

एन विभाग: घाटकोपर आणि आजूबाजूचा परिसर.

प्रशासनाचे आवाहन

पालिकेने स्पष्ट केले आहे की, या तीन दिवसांच्या कालावधीत नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होऊ शकतो. या बदलांबाबतची सविस्तर माहिती स्थानिक विभागांमार्फत एक दिवस आधी दिली जाईल. तांत्रिक कामामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद नसला तरी तो अत्यंत कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मेट्रो कामांच्या नियोजनाचा भाग म्हणून हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. या ४४ तासांच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध साठा जपून वापरावा, असे आवाहन प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरळीत होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement