Imran Khan No-Trust Vote: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला
Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तनमध्ये राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्या विरोधात विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव सभागह अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे या प्रस्तावार आता मतदान (Imran Khan No-Trust Vote) होणार नाही. पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव म्हणजे विदेशी शक्तींकडून करण्यात आलेला कट असल्याचे कारण देत अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सभागृहात आता इमरान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर मतदानच होणार नाही. अध्यक्षांच्या निर्णयानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुसऱ्या बाजूला, अल्पमतात आलेले इम्रान खान हे बहुमताचा आकडा वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (Pakistan Tehreek-e-Insaf) पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) ने सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे इमरान खान सरकार अल्पमतात आले आहे. विरोधकांकडून इमरान खान यांनी आपले बहुमत गमावल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार होते. मात्र, सध्यातरी हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर ते टळले आहे. संसदेत होणारे मतदानाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहोत. पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये शेकडो सैन्य पाहायला मिळत होते. इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा, Nawaz Sharif Attacked In London: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला; मुलगी मरियमने केली इम्रान खानला अटक करण्याची मागणी)

पाकिस्तानमध्ये 73 वर्षांहून अधिक कालावधीपर्यंत लष्कराचीच राजवट प्रभावी राहिली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा आणि परराष्ट्र नितीमध्ये लष्कराची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत चर्चा केली.

दरम्यान, इमरान खान यांनी शनिवारी रात्री पाकिस्तानातील जनता आणि युवकांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात पूर्णपणे भावनिक होत इमरान खान यांनी म्हटले की, पाकिस्तानातील विद्यमान सरकार पाडण्यासाठी विदेशी शक्ती कार्यरत झाल्या आहेत. विदेशी शक्तींविरोधात जनतेने 'शांततामय मार्गाने' आपला विरोध करावा. आपला राग स्वाभाविक असला तरी कोणत्याही स्थितीमध्ये पाकिस्तानी लष्कराविरोधात मात्र टीका अथवा अपशब्द व्यक्त करु नये. इमरान खान यांच्या भाषणानंतर पाकिस्तानमधील राजकीय लढाईने टोक गाठले आहे.