Cargo Vessel Sank: भारतातून 1,600 टन गहू वाहतूक करणारे मालवाहू जहाज बांगलादेशातील नदीत बुडाले
Cargo Vessel Sank | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

भारतातून गहू (Wheat) वाहतूक करणारे एक मालवाहू जहाज (Cargo Vessel) बांगलादेशच्या नदीत बुडाल्याचे (Cargo Vessel Sinks) वृत्त आहे. या जहाजामध्ये सुमारे 66.4 दशलक्ष टाका (Taka बांगलादेशी चलन) किमतीचा 1,600 टन गहू होता. हे जहाज खाडीत एका ठिकाणी जोरदार आदळले होते. त्यामुळे त्याला प्रचंड नुकसान झाले होते. अखेर हे जहाज बंगालच्या उपसागरात मेघना नदीत (Meghna River) बुडाले.

जहाजाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसुार, या जहाजाने चट्टोग्राम बंदराच्या बाहेरील अँकरेजमध्ये एका मोठ्या जहाजातू माल घेतला. त्यानंतर ते ढाक्याच्या बाहेरील नारायणगंज नदी बंदराच्या दिशेने निघाले होते. याच वेळी ही दुर्घटना घडली. जगभरातील गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेला युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष सुरु आहे. तेयैतच 24 फेब्रुवारीपासून काळ्या समुद्रातून निर्यात आणि वाहतूकही कमी आहे. त्यामुळे जगभरातील आयातदार प्रामुख्याने आशिया खंडातील आणि त्यातही भारतीय गहू आयात करण्यास प्राधान्य देत होते. दरम्यान, ही दुर्घटना घडली आहे. हे जहाज समुद्रात रात्रभर बुडत होते. त्यातील गहू वाचविण्याची कोणतीच संधी मिळाली नाही. त्यामुळे गहूसुद्धा पाण्यात बुडाला. (हेही वाचा, Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळात ‘ओएनजीसी’चे P305 जहाज बुडाले; 146 जणांना वाचविण्यात यश)

बांगलादेशच्या जलवाहतूक विभागाचे सहसचिव अताउल कबीर यांनी पीटीआयला सांगितले की,1,600 टन गहू घेऊन हे जहाज पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. गहू वाचविण्याची किंवा तो परत मिळविण्याची कोणतीच संधी सध्यातरी दिसत नाही. अधिकाऱ्याने सांगितले की जहाज पूर्णपणे बुडाले नाही. ते किनारपट्टीच्या लक्ष्मीपूर जिल्ह्यातील तिल्लर चार भागातील एका कालव्यात होते. मात्र, त्यातील गहू पूर्णपणे पाण्याखाली गेला.

जहाजावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, खाडीमध्ये जहाज आदळल्याने त्याच्या पुढच्या भागात एक क्रॅक तयार झाला. त्यामुळे जहाजात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले आणि बचाव कार्य सुरु होण्यापूर्वीच ते पाण्यात बुडाले.