Virat Kohli And Rohit Sharma (Photo Credit - X)

India vs Australia ODI Series: टीम इंडिया या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) जात आहे, जिथे दोन्ही संघ तीन एकदिवसीय (ODI) आणि पाच टी-२० (T20) सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यात, अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील. या मालिकेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, शुभमन गिलकडे रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, हे दोन्ही दिग्गज खेळाडू गिलच्या नेतृत्वाखाली खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, रोहित आणि विराटच्या एकदिवसीय क्रिकेटमधून संभाव्य निवृत्तीबद्दल आता अटकळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) या दौऱ्यात या दोन्ही खेळाडूंना निरोप देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

रोहित आणि विराटला 'फेअरवेल' मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया रोहित आणि विराटला खास निरोप देण्याची योजना आखत आहे. हा निरोप स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय पूर्णपणे खेळाडूंवर अवलंबून असेल. जर त्यांनी निरोप स्वीकारण्यास नकार दिला, तरीही ऑस्ट्रेलियाकडून त्यांना एक विशेष भेट दिली जाईल.  ऑस्ट्रेलियामध्ये या दोन्ही क्रिकेटपटूंचा चाहता वर्ग अत्यंत मजबूत आहे. ऑस्ट्रेलियामधील फॅन्स इंडिया आणि भारत आर्मी (Bharat Army) यांसारखे मोठे चाहते गट देखील या एकदिवसीय मालिकेदरम्यान विराट आणि रोहितसाठी विशेष तयारी करत आहेत.

तिन्ही सामन्यांची तिकिटे विकली गेली

माहितीनुसार "टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येथील वातावरण पूर्णपणे सज्ज आहे. रोहित आणि विराटचे चाहते या संधीचा फायदा घेण्यासाठी दूरदूरून येणार आहेत. तिन्ही सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत, यावरून चाहत्यांची उत्सुकता दिसून येते." चाहते रोहित आणि विराटचे त्यांच्या शानदार कारकिर्दीबद्दल आभार मानू इच्छितो, यासाठी मालिकेदरम्यान स्टेडियममध्ये त्यांच्या नावांचे पोस्टर्स आणि जर्सी दिसतील."

IND vs AUS: भारताविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; 'चॅम्पियन' कर्णधारालाच डच्चू!

ही रोहित आणि विराटची शेवटची एकदिवसीय मालिका असेल का?

चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळताना पाहायची इच्छा असली तरी, आता तसे होण्याची शक्यता कमी दिसत आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आधीच टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौरा

अनेक माजी क्रिकेटपटू त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्याचा आणि तंदुरुस्ती राखण्याचा सल्ला देत असले तरी, केवळ एकदिवसीय सामने खेळल्यास त्यांना २०२७ पर्यंत टीम इंडियासाठी खेळण्याची मर्यादित संधी मिळेल. त्यामुळे, हा रोहित आणि विराटचा ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौरा असू शकतो, असा अनेक चाहत्यांचा आणि क्रिकेट पंडितांचा कयास आहे.