
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून 2025 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे, 11 जणांचा मृत्यू आणि 47 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर बेंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीविरुद्ध निष्काळजीपणाचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. ही दुर्घटना आरसीबीच्या 18 वर्षांनंतरच्या पहिल्या आयपीएल विजयाच्या उत्सवात घडली, ज्यामुळे बेंगळुरूच्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाचे क्षण दुखद घटनेत बदलले.
अहवालानुसार, 3 जून 2025 रोजी रात्री, आरसीबीने अहमदाबाद येथे पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभूत करत आयपीएल 2025 चे विजेतेपद मिळवले. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बेंगळुरूच्या विधान सौधा येथे दुपारी 4 वाजता एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले, त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियम येथे विजय मिरवणूक आणि उत्सव ठरला होता. आरसीबीने सकाळीच सोशल मीडियावर 5 वाजता मिरवणूक आणि स्टेडियममधील उत्सवाची घोषणा केली होती, ज्यामुळे शहरभरातील लाखो चाहते स्टेडियमच्या परिसरात जमले.
मात्र, स्टेडियमच्या गेट नंबर 1 आणि 15 येथे मोफत पासच्या अफवांमुळे आणि मर्यादित प्रवेशामुळे गर्दी अनियंत्रित झाली. स्टेडियमची क्षमता 35,000 असताना, 2 ते 3 लाख चाहत्यांनी परिसरात गर्दी केली. अरुंद मार्ग आणि अपुर्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गोंधळ वाढला, आणि सायंकाळी 4:45 वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 13 वर्षांच्या मुलीपासून 33 वर्षांच्या तरुणापर्यंतचे चाहते होते. याशिवाय, 47 जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, आणि अनेकांना डोक्याच्या जखमांमुळे निमहान्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
RCB Victory Parade Stampede:
Bengaluru stampede | FIR filed against RCB, DNA (event manager), KSCA Administrative Committee and others at Cubbon Park Police Station. FIR stated criminal negligence in the stampede incident. Sections 105, 125 (1)(2), 132, 121/1, 190 R/w 3 (5) have been invoked in the FIR.
— ANI (@ANI) June 5, 2025
बेंगळुरू पोलिसांनी 5 जून 2025 रोजी आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स आणि केएससीए प्रशासकीय समितीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलामांनुसार, तक्रार दाखल केली, ज्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केएससीए अधिकाऱ्यांवर गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या अपुर्या उपाययोजनांचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर फौजदारी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला, कारण आयोजकांनी मोठ्या गर्दीची अपेक्षा असूनही पुरेशी तयारी केली नव्हती. (हेही वाचा: RCB Victory Parade Stampede: बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आरसीबीच्या विजय परेडदरम्यान चेंगराचेंगरी; तब्बल 11 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी)
कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि राज्य सरकारला 10 जूनपर्यंत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि सी. एम. जोशी यांच्या खंडपीठाने ही बाब जनहित याचिका म्हणून नोंदवली. याशिवाय, बेंगळुरू शहरी जिल्ह्याचे उपायुक्त जी. जगदीश यांच्या नेतृत्वाखाली मॅजिस्ट्रियल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.