IPL 2022, PBKS vs RCB: शाहरुख खान - Odean Smith याची आतषबाजी, रॉयल चॅलेंजर्सवर 5 विकेट्स राखून पंजाबचा दणदणीत विजय!
ओडियन स्मिथ (Photo Credit: Twitter/PunjabKingsIPL)

IPL 2022, PBKS vs RCB: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आपल्या पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघावर पाच विकेटने दणदणीत विजय मिळवला. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि ओडेन स्मिथ (Odean Smith) पंजाबच्या विजयाचे खरे नायक ठरले. शाहरुख खान 24 धावा आणि ओडेन स्मिथ 25 धावा करून फक्त नाबादच परतले नाही तर त्यांनी आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर आरसीबीच्या (RCB) तोंडून विजय खेचून आणला. अशा परिस्थितीत दोनशे धावसंख्या करूनही बेंगलोरला आपल्या खराब गोलंदाजीचा फटका बसला आणि त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाबसाठी शिखर धवन आणि भानुका राजपाक्षा यांनी 43-43 धावांची महत्वाची खेळी केली. तसेच कर्णधार मयंक अग्रवालने 32 आणि लियाम लिविंगस्टोनने 19 धावांचे छोटेखानी योगदान दिले. (IPL 2022: ओडेन स्मिथ याने टाकले आयपीएल 15 चे आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक, चार ओव्हरमध्ये RCB ने लुटल्या ‘इतक्या’ धावा)

आरसीबीने दिलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात शिखर धवन आणि मयंक अग्रवाल या नवीन सलामी जोडीने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 71 धावांची सलामी भागीदारीने संघाच्या विजयाचा आश्वास मिळवून दिला. यादरम्यान वनिंदूं हसरंगा याने मयंकला 32 धावांवर बाद करून आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. यानंतर धवनने राजपाक्षाच्या साथीने हल्ला बोल करून संघाला विजयाच्या जवळ नेले असताना हर्षल पटेलने धवनला पॅव्हिलियनची वाट दाखवली. धवन पाठोपाठ राजपाक्षा देखील माघारी परतला. फटकेबाजी करणारा लिविंगस्टोन देखील संघाला विजयीरेष ओलांडून देण्यात अपयशी ठरला. यानंतर निर्णायक क्षणी शाहरुख खान आणि ओडेन स्मिथ यांनी मोर्चा सांभाळला व पंजाबला विजयीरेष ओलांडून दिली. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर आकाश दीप, वनिंदूं हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 काढली.

यापूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्सने कर्णधार फाफ डु प्लेसिस याची 88 धावांची झंझावाती खेळी, तर विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी अखेरच्या षटकात केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर पंजाबसमोर विजयासाठी 206 धावांचे लक्ष्य ठेवले. विराट 41 आणि कार्तिक 32 धावा करून नाबाद परतला. पंजाबकडून राहुल चहरने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 22 धावा देत एक विकेट घेतली.