IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सविरुद्ध Shikhar Dhawan याची मोठी करामात, सुरेश रैना आणि विराट कोहली यांना केलं ओव्हरटेक
शिखर धवन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) दमदार खेळी केली. टॉस गमावून पंजाब किंग्सकडून फलंदाजीला उतरलेल्या शिखर धवनने आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सविरुद्ध एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. धवनने या दरम्यान आयपीएल 2022 चे पहिले अर्धशतकही झळकले. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत शिखर धवनची बॅट वेगाने धावा करत होती, मात्र त्याला अर्धशतक झळकावता आले नव्हते. तथापि मुंबईविरुद्ध त्याने दमदार खेळ दाखवत आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने सुरेश रैना (Suresh Raina) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाही मागे टाकलं आहे. (IPL 2022, MI vs PBKS: पंजाबकडून मुंबईसमोर विजयासाठी 199 धावांचे आव्हान, शिखर धवन याची तुफान कामगिरी; रोहितच्या ‘पलटन’ला आता फलंदाजांकडून आस)

धवनने 37 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने खणखणीत अर्धशतक ठोकले. धवनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 45 वे अर्धशतक ठरले. आयपीएलच्या इतिहासात केवळ डेविड वॉर्नर यानेच त्याच्यापेक्षा जास्त अर्धशतके झळकावली आहेत. या लीगमध्ये वॉर्नरने आतापर्यंत 50 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान, धवनच्या आधी मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता, ज्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 36 सामन्यांत 850 धावा केल्या होत्या. तर धवनने 27 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने 32 सामन्यांमध्ये 827 धावा केल्या आहेत. धवनने या डावात 51 वी धावा घेताच रैनाचा विक्रम धुळीस मिळवला.

दुसरीकडे, पंजाबसाठी सावध सुरुवातीनंतर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा लयीत दिसत आहे. मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याबद्दल बोलायचे तर पंजाबने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवनच्या झटपट खेळीच्या जोरावर संघाने 198 धावांपर्यंत मजल मारली. अग्रवाल-धवनच्या सलामी जोडीने संघाला दमदार सुरुवात करून देत सलामीसाठी 97 धावा केली. पंजाब संघासाठी हंगामातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. कर्णधार मयंक अग्रवाल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने झंझावाती 52 धावा केल्या. धवननेही संघासाठी 70 धावा केल्या.