IPL 2020 PlayOffs: कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवाने मुंबई इंडियन्सला मिळालं प्ले ऑफचं तिकीट, हे 3 संघही आहेत दावेदार
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2020 PlayOffs: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. केकेआरने (KKR) पहिले फलंदाजी करत सीएसकेसमोर (CSK) विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य ठेवले ज्याच्या प्रत्युत्तरात सुपर किंग्जच्या संघाने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले आणि 6 विकेटने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने आता आणखी 2 गुणांची कमाई केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला आणि यासह मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने 16 गुणांसह प्ले ऑफचं तिकीट मिळवलं. म्हणजेच केकेआरच्या पराभवात मुंबईचा थेट फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरला तर अन्य तीन संघही प्ले ऑफचे दावेदार आहेत. (CSK vs KKR, IPL 2020: रुतुराज गायकवाडचा केकेआरला दे धक्का! CSKने 6 विकेटने नाईट रायडर्सविरुद्ध मिळवला नाट्यमय विजय)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ 14 गुणांसह दुसर्‍या स्थानावर कायम आहे, तर दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर सलग पाच विजय नोंदवणारा केएल राहुलचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, केकेआरला आजचा पराभव जिव्हारी लागला असेल कारण या पराभवानंतर केकेआरचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. या पराभवानंतरही केकेआर संघ पॉईंट्स टेबलवर 12 गुणांसाठी पाचव्या क्रमांकावर आहे आणि आता फ्रँचायझी अन्य संघांच्या कामगिरीच्या आधारे प्ले-ऑफमध्ये पात्रता मिळण्याची आशेत असेल. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ प्रत्येकी 10 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, आजच्या सामन्यात केकेआरने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात सीएसकेसाठी सलामी फलंदाज रुतुराज गायकवाडने सलग दुसरे अर्धशतक ठोकले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. रुतुराजने 72 धावांचा शानदार डाव खेळला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले, पण मोक्याच्या क्षणी पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडलं. सीएसकेला अखेरच्या 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना जडेजाने षटकार लगावला आणि अंतिम चेंडू षटकार मारून संघाचा विजय निश्चित केला.जडेजा नाबाद 31 धावा आणि कुरन नाबाद 13 धावा करून परतला.