IND vs ENG 4th T20I 2021: सूर्यकुमार यादवचा झंझावात, भारताचा धावांचा डोंगर; जोफ्रा आर्चरच्या 4 विकेट, इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य
सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th T20I 2021: इंग्लंडविरुद्ध (England) ‘करो या मरो’च्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 185 धावांपर्यंत मजल मारली आणि विरोधी संघाला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी डेब्यू करणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दणक्यात आपले आगमन जाहीर केले. टीम इंडिया (Team India) अडचणीत असताना स्कायने पुढाकार घेतला आणि 28 चेंडूत अर्धशतक ठोकले व सर्वाधिक 57 धावा केल्या. रिषभ पंतने 30 धावा आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 37 योगदान दिले. अखेर शार्दूल ठाकूर 9 धावा करून नाबाद परतला. शिवाय कर्णधार विराट कोहली एकच धाव करू शकला तर केएल राहुल 14 आणि रोहित शर्मा 12 धावाच करू शकले. दुसरीकडे, इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) 4 विकेट मिळाल्या. शिवाय आदिल रशीद, मार्क वूड, बेन स्टोक्स आणि सॅम कुरन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 5 सामन्यातील मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर असल्याने यजमान संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. (IND vs ENG 4th T20I 2021: जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर Suryakumar Yadav ने खेचला खणखणीत सिक्स Watch Video)

दरम्यान, आजच्या सामन्यात आर्चरने 20 धावसंख्येवर भारताला पहिला धक्का दिला आणिरोहित-राहुलची सलामी जोडी मोडली. आर्चरने आपल्या गोलंदाजीवर रोहितला कॅट आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर, पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर सिक्स खेचत सुरुवात केली. भारताने पॉवर प्लेमध्ये 1 विकेट गमावून 45 धावा केल्या. राहुलला स्टोक्सने 14 धावांवर बाद केलं. कर्णधार विराट मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टंपिग आऊट झाला. रशीदने टाकलेल्या गुगलीवर विराट मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला, पण बॅट आणि बोलचा संपर्क झाला नाही आणि विराट 1 धाव करुन तंबूत परतला. त्यांनतर, आक्रमक फलंदाजी करत असलेला सूर्यकुमार विवादित पद्धतीने आऊट झाला. सूर्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. रिषभ पंत 30 धावा करुन बोल्ड झाला. पंतनंतर हार्दिकला वूडने बेन स्टोक्सकडे झेलबाद केलं. हार्दिकने 11 धावा केल्या. पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आर्चरने श्रेयसला माघारी धाडलं.

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा चौथा सामना ‘करो या मरो’चा आहे. मालिकेच्या पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली तर यजमान संघाने दुसरा सामना जिंकला.