IND vs ENG 2nd ODI 2021: केएल राहुलचे धमाकेदार शतक, विराट-पंतचा अर्धशतकी तडाखा; भारताचे इंग्लंडला विजयासाठी 337 धावांच तगडं आव्हान
केएल राहुल आणि विराट कोहली  (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध पुणे येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने पहिले फलंदाजी करत केएल राहुलचे (KL Rahul) शानदार शतक, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 336 धावा केल्या आणि इंग्लंडपुढे विजयासाठी 337 धावांच तगडं आव्हान दिलं आहे. टीम इंडियासाठी राहुलने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली तर विराटने 66 धावा, पंत 77 धावा आणि हार्दिक पांड्याने35 धावांचे योगदान दिले. कृणाल 12 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, सुरुवातीला इंग्लिश गोलंदाजांनी प्रभावी मारा केला मात्र मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आणि तिहेरी धावसंख्येपर्यंत मजल मारली. इंग्लंडसाठी रीस टोपली आणि टॉम कुरन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर सॅम कुरन व आदिल रशीद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs ENG 2nd ODI 2021: Virat Kohli ने तिसर्‍या क्रमांकावर केली रेकॉर्ड-ब्रेक बॅटिंग, कोणत्याही भारतीय फलंदाजाला नाही करता आला हा पराक्रम)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. 9 धावसंख्येवर पहिल्या वनडे सामन्यात 98 धावा फटकावणारा शिखर धवन अवघ्या 4 धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर रोहितने खणखणीत 5 चौकार लगावले, पण 37 धावांवर भारताला दुसरा झटका बसला. रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठार आणि 25 धावा करुन बाद होऊ पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर, विराट आणि राहुलने लगाम आपल्या हाती घेतली. दोंघांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान कोहलीने 63 चेंडूत सलग दुसरं अर्धशतक झळकावलं, पण भारतीय पुन्हा एकदा शतक झळकावण्यात अपयशी ठरला आणि 66 धावांवर माघारी परतला. विराट पाठोपाठ राहुलने इंग्लंडविरुद्ध मालिकेत सलग दुसरं आणि वैयक्तिक 10वं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर, पंतने राहुलला चांगली साथ देत फटकेबाजी सुरूच ठेवली.

राहुल आणि पंतने देखील 113 धावांची शतकी भागीदारी केली ज्यामुळे संघाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरूच ठेवली. पंतने अवघ्या 28 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने पंतने 50 धावा फटकावल्या. यांनतर, राहुलने 108 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने वनडे करिअरमधील पाचव्यांदा शंभरी गाठली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 अशा आघाडीवर आहे.