BCCI अध्यक्षांकडून रोहित शर्मा - विराट कोहलीची पाठराखण, Dhoni शी ऋषभ पंतच्या तुलनेवर दिले हे उत्तर
रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मंगळवारी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) आयपीएल (IPL) मधील खराब लय चिंतेचे कारण नसल्याचे म्हटले आणि ते लवकरच धावा काढण्यास सुरुवात करतील असे म्हणून दोन्ही दिग्गज फलंदाजांची पाठराखण केली आहे. विक्रमी पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहितसाठी सध्या सुरु असलेला हंगाम खराब ठरला. त्याने 14 डावांमध्ये 19.14 च्या सरासरीने 120.17 च्या स्ट्राइक रेटने 268 धावा केल्या. तसेच मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. (IPL 2022: विराट कोहलीला खराब फॉर्मची पर्वा नाही, धावांच्या दुष्काळात पाहा काय म्हणाला Watch Video)

कोलकाता येथे एका कार्यक्रमात गांगुली म्हणाला, “प्रत्येकजण माणूस आहे. चुका होतील पण कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने कर्णधार म्हणून पाच आयपीएल विजेतेपदे, आशिया चषक विजेतेपद पटकावले आहे. कर्णधार म्हणून त्याचा विक्रम अभूतपूर्व आहे. चुका होतील कारण ते सर्व मानव आहेत.” दुसरीकडे, आयपीएलच्या साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यापूर्वी कोहलीचा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतक झळकावण्यापूर्वी त्याने 13 डावांत केवळ 236 धावा केल्या होत्या. यादरम्यान तो पहिल्याच चेंडूवर तीन वेळा खाते न उघडता बाद झाला. दोघांचेही समर्थन करताना गांगुली म्हणाला, “ते खूप चांगले खेळाडू आहेत. मला खात्री आहे की ते धावा करायला सुरुवात करतील. ते इतके क्रिकेट खेळतात की कधी कधी फॉर्म गमावतात. गेल्या सामन्यात कोहली खरोखरच चांगला खेळला, विशेषत: जेव्हा आरसीबीला त्याची गरज होती.”

या दोघांशिवाय ऋषभ पंतही आयपीएलमध्ये बॅटने प्रसिद्धी मिळवू शकला नाही. विकेटच्या मागे असलेल्या DRS बाबतच्या त्याच्या निर्णयावरही टीका झाली होती पण गांगुलीने यष्टीरक्षक फलंदाजाला साथ दिली. तो म्हणाला, “पंतची धोनीशी तुलना करू नका. धोनीला खूप अनुभव आहे. त्याने आयपीएल, कसोटी आणि एकदिवसीय अशा 500 हून अधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. पंतची धोनीशी तुलना करणे योग्य नाही.”