PIB Fact Check: सोशल मीडीयात 31 डिसेंबर पर्यंत भारत बंद चे खोटे मेसेजेस वायरल; केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कोणतीही घोषणा नसल्याचा पीआयाबीचा खुलासा
PIB Fact Check | PC: Twitter

भारतामध्ये कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याची चिन्हं असतानाच आता पुन्हा ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोविड 19 व्हेरिएंटची दहशत पसरायला सुरूवात झाली आहे. युरोप आणि अमेरिकेत या व्हेरिएंटमुळे समोर येणार्‍या रूग्णसंख्येचे आकडे मनात धडकी भरवणारे आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती लोकांच्या मनात आहे. यामधूनच आता खोट्या बातम्या पसरायला पुन्हा सुरूवात झाली आहे. भारतात 31 डिसेंबर पर्यंत पुन्हा सारं बंद अशा आशयाचे काही मेसेज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. हे मेसेज तुमच्याकडेही आले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि फॉर्वर्ड करणं टाळा. कारण भारत सरकाराकडून अद्याप कोणत्याही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. पीआयबीने (PIB) खुलासा करत 31 डिसेंबर पर्यंत भारत बंद हे वायरल होत असलेले मेसेज खोटे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेक या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून कोरोना संकटकाळात सोशल मीडीयात फिरणार्‍या अनेक फेक न्यूज, खोट्या वृत्तांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

पीआयबी ट्वीट

भारतात देखील ओमिक्रॉन वायरसचा धुमाकूळ वाढत आहे. आजच्या केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही रूग्णसंख्या 236 च्या वर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 65 रूग्ण आहेत. पण या आजारावर मात करणं शक्य आहे. केवळ ओमिक्रॉन वायरस झपाट्याने पसरत असल्याने त्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली आहे.