उस्मानाबाद: 'ओमराजे निंबाळकर जिंकले तर माझी मोटारसायकल तुमची', शेतकरी-मजूर यांच्यात करारनामा
Two-wheeler exchange Betting in two youth at Osmanabad | (Photo Credit : Twitter)

देशभरात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) रणधुमाळी जोरात सुरु असतानात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha Constituency)दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या काट्याच्या टक्करीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या दोन नेत्यांसोबतच हा मतदारसंघ एका करारनाम्यामुळेही महाराष्ट्रभर चर्चेत आला आहे. हा करारनामा शिवसेना (Shivsena) उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या विजयाबाबत असून, तो बाजीराव विष्ण करवर आणि शंकर विठ्ठल मोरे यांच्यात झाला आहे. ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjit Pati) यांच्यात काट्याची टक्कर आहे. दरम्यान, या दोघांमध्ये ओमरेजे जिंकले तर करारनामा लिहून देणारा आपली मोटरसायकल करारनामा लिहून घेणारास देणार आहे. तर, ओमराजे पराभूत झाले तर, करारनामा लिहून घेणारा आपली मोटरसायकल करारनामा लिहून देणारास देणार आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटरवर शेअर केला करारनामा

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या विचित्र करारनाम्याची चर्चा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या करारनामापक्षाची छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहेत. त्यामुळे हा करारनामा आता महाराष्ट्रभर पोहोचला आहे.

कसा आहे करारनामा?

बाजीराव विष्ण करवर (वय 40 वर्षे, धंदा-शेती, रा. राघुचीवाडी, ता.जि. उस्मानाबाद) यांनी हा करारनामा लिहून घेतला आहे. तर, शंकर विठ्ठल मोरे (वय-34 वर्षे, धंदा - मजुरी, रा. रघुचीवाडी. ता. जि. उस्मानाबाद) हे करारनामा लिहून देणारे आहेत.

काय म्हटले आहे करारनाम्यात?

करारनाम्यामत म्हटले आहे की, 'कारणे करारनामा लिहून देतो की, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उस्मानाबाद लोकसभा उमेदवार श्री. ओम राजेनिंबाळकर हे जर निवडूण आले तर माझे मालकी व ताब्यातील डिक्हर बाजाज कंपनीची दोन चाकी गाडी आरटीओ पासिंग नं. MH-25/AC-3239 जिचे मॉडेल 2014 असे असून चिसी नं....... इंजिन नं. ...... असा आहे. सदरील गाडी लिहून घेणार यांना राजेनिंबाळकर निवडणूक आले तर बक्षिस म्हणून विना मोबदला दिनांक 24/05/2019 रोजी ताब्यात देण्यात येईल. सदरील गाडीची मालकी ही लिहून घेणार यांची राहील त्याबाबत माझी किंवा माझे इतर वारसांची काही करकत वा तक्रार राहणार नाही. सदरील गाडी 24/05/2019 नंतर लिहून घेमार यांच्या नावे मी करुन देईन. त्याबाबत माझी कोणतीही हरकत वा तक्रार राहणार नाही. परंतू, जर ओम राजेनिंबाळकर जर निवडणूक हारले तर तर लिहून घेणार हे त्यांची दोन चाकी गाडी माझे नावे करतील असे ठरले आहे.' (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: बसप पक्षाच्या कार्यकर्त्याने चुकून भाजपला मत दिल्याने बोट कापले)

जयंत पाटील ट्विट

'सदरची गाडी दिनांक. 24/05/2019 रोजी लिहून घेणार यांच्या ताब्यात आहे त्या स्थितीत दिली जाणार आहे. सदरील गाडी वर दिनांक 24/05/2019 रोजीपर्यंतच्या पोलीस केस, अपघात केस, आर.टी.ओ. केसेस तसेच कोणतेही कर्ज व इतर काही केसेस असतील त्याची संपूर्ण जबाबदारी ही लिहून देणार यांच्यावर राहील. व दिनांक 24/05/2019 पासून पुढील इन्श्युरन्स, पोलीस केस, अपघात केस, आर.टी.ओ. केसेस व इतर काही केसेस असतील त्याची संपूर्ण जबाबदारी ही हिलून घेणार यांची राहील.'

'सदरील करारनामा मी माझ्या राजीखुशीने कोणत्याीह प्रकारचे नशापाणी न करता, कोणाच्याही दबावाला न बळी पडता राजीखुशीने साक्षीदारांसमक्ष लिहून दिला आहे. तो खरा व बरोबर आहे', असे या करारनामापत्रात म्हटले आहे. हा करारनामा 20/04/2019 रोजी करण्यात आला असून, त्यावर लिहून देणारा, लिहून घेणारा व साक्षीदार सहदेव नागनाथ नामदास आणि विकास नागनाथ गोरवे (दोघेही रा. राघुचीवाडी, ता. जि. उस्मानाबाद) यांच्या सह्या आहेत.