Accident On Mumbai-Goa Highway: रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर ST Bus ची कंटेनर ट्रकला धडक; एक ठार, 28 जखमी
Accident (PC - File Photo)

Accident On Mumbai-Goa Highway: रविवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) राज्य परिवहन (ST) बसची कंटेनर ट्रकला धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 28 जण जखमी झाले. बस आणि कंटेनर ट्रक शेजारी जात असताना तळेगाव गावातील माणगावजवळ ही घटना घडली. यासंदर्भात रायगड पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती देताना सांगितले की, बसची ट्रकला धडक बसली. डोंबिवलीतील विनोद तराळे (38) या प्रवाशाचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी वैष्णवी आणि 15 वर्षांचा मुलगा अथर्व गंभीर जखमी झाला आहे. सर्व 28 प्रवाशांमध्ये नऊ महिला, तीन मुली आणि पाच मुले जखमी झाली आहेत.

या घटनेनंतर एमएसआरटीसी अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यासाठी बसची व्यवस्था केली. तत्पूर्वी, शनिवारी सकाळी मुंबईच्या उत्तरेकडील मालवणी येथे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला वेगवान बेस्ट बसने धडक दिल्याने मृत्यू झाला. (हेही वाचा - Mumbai: भरधाव BEST बसची 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धडक; विद्यार्थिनीचा मृत्यू, मालवणी येथील घटना)

मालवणी बस डेपोच्या गेट क्रमांक आठजवळ हा अपघात झाला असून पीडितेचे नाव फरहीन खान असे आहे. अपघात झाला तेव्हा ती कॉलेजला जात होती. बस चालक महादेव एकनाथ ससाणे यांच्यावर निष्काळजीपणामुळे तसेच बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर आंदोलन केले. पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईच्या किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात केले होते. परंतु पोलिसांनी निषेधाचे कव्हरेज करणार्‍या मीडिया कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केल्याने काही काळ गोंधळ उडाला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेला तेच जबाबदार असल्याने अभियंत्यांच्या सत्काराला आपला विरोध असल्याचे संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महामार्गाच्या एका लेनचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशपांडे यांनी दावा केला की, नव्याने बांधलेल्या सिमेंट काँक्रीटच्या लेनमध्येही खड्डे पडले आहेत.